मराठा आरक्षण : राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड - धनंजय मुंडे

राज्यात याआधी मराठा मोर्चे काढण्यात आले. मात्र, त्याची साधी दखल घेण्यात आलेली नाही. राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय. 

Updated: Aug 9, 2017, 01:27 PM IST
मराठा आरक्षण : राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड -  धनंजय मुंडे   title=

मुंबई  : राज्यात याआधी मराठा मोर्चे काढण्यात आले. मात्र, त्याची साधी दखल घेण्यात आलेली नाही. राज्य सरकारचा खोटारडेपणा उघड झालाय.नागपूरच्या मराठा क्रांती मोर्चानंतरच्या बैठकीवर काहीच कार्यवाही केली नाही, असा जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांवर ५७ ठिकाणी मोर्चे काढूनही सरकारकडून काहीच कार्यवाही झाली नसल्याच्या आरोप  धनंजय मुंडे यांनी केला असून सरकारच्या खोटारडेपणाचे एक पत्र त्यांनी आज विधान परिषदेत सादर केले. 

विधान परिषदेचा आज कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे मराठा आरक्षणाच्या व मराठा क्रांती मोर्चाचा विषय उपस्थित केला. मराठा समाजाच्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही केली नाही.  त्यामुळे आम्हाला आता चर्चा नको, तर निर्णय घ्या अशी मागणी त्यांनी लावून धरली. सरकारने या मोर्च्यांची कोणतीही दखल घेतली नसल्याचे सांगताना त्यांनी सरकारच्या खोटारडेपणाचा बुरखा फाडणारे एक पत्र वाचून दाखविले.  

नागपूर येथील १४ डिसेंबर २०१६ रोजीच्या मराठा क्रांती मोर्चानंतर एका शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीतीच्या इतिवृत्ताची आणि बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाचा मागण्यांबाबत मागणीनिहाय करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी सरकारकडे मागितली. मात्र, अशी कोणती बैठक झाली नाही.  केवळ निवेदन स्विकारले असल्याचे सरकारच्यावतीने आपल्याला कळविल्याचे मुंडे म्हणाले. यावरुनच सरकारचे धोरण स्पष्ट होते. हा मुद्दा उपस्थित झाल्याने  दोन वेळा गोंधळामुळे कामकाज तहकूब झाले.