पावसाच्या तडाख्यात घर जमीनदोस्त, रात्रीच मुला-बाळांसह कुटुंबाचे तहसील कार्यालयात ठाण

Rain in Dharashiv : राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काही कुटुंबाना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Rain )  नाशिक विभागात 6 हजार हेक्टरवर पिकांना फटका आहे. संभाजीनगरात गहू पीक आडवं तर शिरुरमध्ये मक्याचं मोठं नुकसान झाले आहे. मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे.  तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही  सध्या पावसाची शक्यता आहे.

Updated: Mar 7, 2023, 03:49 PM IST
पावसाच्या तडाख्यात घर जमीनदोस्त, रात्रीच मुला-बाळांसह कुटुंबाचे तहसील कार्यालयात ठाण title=

Rain in Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील काही कुटुंबाना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Rain ) धाराशिवच्या खासापुरी इथल्या स्थलांतरित कुटुंब रात्री 2 वाजता मुला बाळांसह तहसील कार्यालयात आश्रयाला आले. वादळामध्ये अनेकांची पत्र्याची घरे जमीनदोस्त झाली. यामुळे जिवाचा बचाव करत अडकलेल्या लहान मुलांना आणि वयोवृद्धांना बाहेर काढून अखेर या कुटुंबानी तहसील कार्यालय गाठले. तसेच जोपर्यंत आम्हाला घर मिळत नाही तोपर्यंत तहसील कार्यालय सोडणार नसल्याचा निर्धार या कुटुंबानी केला. तर मार्चमध्ये माळशेज घाटात पावसाळ्याचा अनुभव आला. माळशेज घाटात अवकाळी पावसाची तुफानी बॅटिंग केली. घाटमाथ्यावरचं पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकही थांबविण्यात आली होती. 

शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दरम्यान, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अवकाळी पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झाले आहे. रब्बी पीक, गहू, मका, हरभऱ्याचं हातातोंडाशी आलेलं पीक आडवं झालं. त्यामुळे शेतकरी ऐन होळी सणाच्या दिवशी संकटात आहे. आता मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. नाशिक विभागात 6 हजार हेक्टरवर पिकांना फटका आहे. संभाजीनगरात गहू पीक आडवं तर शिरुरमध्ये मक्याचं मोठं नुकसान झाले आहे. संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरुय. पावसामुळे गारठा वाढलाय. दुसरीकडे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर अहमदनगरच्या कोपरगावातही अवकाळीचा फटका बसलाय. सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं बळीराजा चिंतेत आहे. कांद्याचे भाव कोसळलेले असतानाच अवकाळी पावसाच्या तडाख्यानं गहू आणि हरबरा पीक धोक्यात आलंय. त्याचबरोबर काढणीला आलेले कलिंगड देखील खराब होण्यास सुरुवात झाली आहे. 

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

राज्यभरात पुढच्या तीन ते चार तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार काही ठिकाणी पाऊस झाला मुंबई आणि ठाण्यातही पावसाच्या सरी कोसळ्यात. तसेच पुणे, अहमदनगरमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विदर्भात वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात अनेक भागात आजही अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात गारपिट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्यानं अवकाळी पावसाची शक्यता आहे.  तसेच पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीडमध्येही  सध्या पावसाची शक्यता आहे. पश्चिमी चक्रवातामुळे अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हवेच्या या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अवकाळी पाऊस होत असल्याचं तज्ज्ञाचं म्हणणं आहे.. 9 मार्चपर्यंत मुंबई, कोकण वगळता मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.