Ind vs Ban 2nd Test: दुसऱ्या दिवशीही पावसाचे सावट, खेळ वेळेवर होणार नाही सुरू

IND vs BAN 2nd Test Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना कानपूर येथे होत आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ३५ षटकांचा खेळ होऊ शकला.

Updated: Sep 28, 2024, 10:30 AM IST
Ind vs Ban 2nd Test: दुसऱ्या दिवशीही पावसाचे सावट, खेळ वेळेवर होणार नाही सुरू  title=

India vs Bangladesh 2nd Test Day 2: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपुर येथे कसोटी सामना सुरु आहे. या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. शुक्रवारी पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळात व्यत्यय आला आणि यामुळे फक्त ३५ षटकांचा खेळ खेळता आला. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ३ विकेट्सवर १०७ धावा केल्या. आता आजही मॅचवर पावसाचे सावट आहे. दुसऱ्या दिवशीही पाऊस अडथळा ठरल्यामुळे सामना सुरु होण्यास विलंब होत आहे. 

कानपूरमध्ये पाऊस सुरूच 

ताज्या अपडेटनुसार, कानपूरमध्ये गेल्या एक तासापासून पाऊस पडत आहे. संपूर्ण मैदान व्यापले आहे. पाऊस थांबल्यानंतर मैदान कोरडे होईल आणि त्यानंतरच सामना सुरू होऊ शकेल. 

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळाडू आहेत? 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल,  शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज हे खेळाडू आहेत. 

बांगलादेश इलेव्हन इलेव्हनमध्ये कोण खेळाडू आहेत? 
नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद हे खेळाडू आहेत. 

कानपूरमध्ये रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास
टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात रंगलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये एक मोठा इतिहास रचला आहे. अश्विन हा रेड बॉल फॉरमॅटमध्ये आशियामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आशियातील कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनण्याचा अनिल कुंबळेचा विक्रम मोडून आर अश्विनने हा इतिहास रचला आहे. रविचंद्रन अश्विनने आशियायी खेळपट्टीवर ४२० विकेट्स घेतल्या आहेत.

पाऊसामुळे आज सामना नाही झाला तर...
जर आजच्या दिवशीही पाऊस तसाच राहिल्यास हा खेळ तिसऱ्या दिवशी होण्याची शक्यता आहे. परंतु हवामान असेच खराब राहिल्यास सामना संपुष्टात येईल.