क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ

Anshuman Gaekwad passed away : भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचे कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर बुधवारी निधन झाले. 

सौरभ तळेकर | Updated: Aug 1, 2024, 02:19 AM IST
क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांचं निधन, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ title=
Anshuman Gaekwad passed away

Anshuman Gaekwad Dies : भारताचे माजी फलंदाज आणि कोच अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) यांचं 71 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते ब्लड कॅन्सरशी झुंज देत होते. मात्र, बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अंशुमन गायकवाड यांच्यावर गेल्या एका वर्षापासून लंडनच्या किंग कॉलेज रुग्णालयात उपचार होते. मात्र, डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले अन् त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे आता क्रिडाविश्वात शोककळा पसरली आहे.

कपिल देव, मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, मदनलाल, रवी शास्त्री आणि कीर्ती आझाद यांनी अंशुमन गायकवाड यांना उपचारासाठी निधी मिळावा यासाठी अनेक प्रयत्न केले. तर कपिल देव यांनी जाहीरपणे बीसीसीआयला आवाहन केलं होतं. तर बीसीसीआयने देखील मदतीला हात पुढे करत अंशुमन गायकवाड यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी तातडीने 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

कोण होते अंशुमन गायकवाड?

महान फलंदाज सुनील गावस्कर यांचा उजवा हात म्हणून ओळखले जाणारे अंशुमन गायकवाड यांनी पाकिस्तानला घाम फोडला होता. गायकवाड यांनी 1983-84 मध्ये जालंधर कसोटी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 201 धावा करण्यासाठी 671 मिनिटे फलंदाजी केली. पाकिस्तानसाठी अंशुमन गायकवाड यांची विकेट काढणं अशक्य झालं होतं. अंशुमन गायकवाड यांच्या या इनिंगची कीर्ती जगभरात गाजली होती.

दरम्यान, अंशुमन गायकवाड यांचा क्रिकेटचा वारसा उल्लेखनीय आहे. त्यांनी 1975 ते 1987 दरम्यान भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले होते. नंतर दोन वेगवेगळ्या कार्यकाळात भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. अंशुमन गायकवाड हे 1997 ते 1999 दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. अनेक सामन्यात अंशुमन गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

दरम्यान, "अंशुमन गायकवाडजी त्यांच्या क्रिकेटमधील योगदानासाठी स्मरणात राहतील. ते एक प्रतिभाशाली खेळाडू आणि उत्कृष्ट प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना शोक आहे. ओम शांती", असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट करत म्हटलं आहे.