अण्णांनी उपोषण सोडले, लढाई मात्र सुरूच!

सशक्त लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी एमएमआरडीए मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी प्रकृती अस्वास्थ आणि संसदेतील विदारक चित्र पाहून बुधवारी सायंकाळी आपले उपोषण सोडले. मात्र, भ्रष्टाचार विरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केले.

Updated: Dec 28, 2011, 07:44 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

सशक्त लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी एमएमआरडीए मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी प्रकृती अस्वास्थ आणि संसदेतील विदारक चित्र पाहून बुधवारी सायंकाळी आपले उपोषण सोडले. मात्र, भ्रष्टाचार विरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केले.

 

आज सायंकाळी सुरूवातीला अण्णांनी केजरीवाल यांना लिंबूपाणी देऊन त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर प्रतिक्षा फटांगणे या राळेगणसिद्धीहून आलेल्या चिमुरूडीच्या हातून सरबत घेऊन अण्णांनी उपोषण सोडले.

 

तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या अण्णांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले.

 

गेल्या चार-पाच दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात आले होते.

 

काल संसदेत लोकपाल विधेयकावर चर्चा झाली. त्या चर्चेवर अण्णा यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारची भ्रष्टाचार नष्ट करण्याची इच्छा नाही. बहुमताच्या जोरावर पक्ष एकत्र येऊन हुकुमशाही मार्गाने विधयेक संमत करतात. ही लोकशाही की हुकूमशाही असा सवाल अण्णांनी व्यक्त केला.

 

सध्या उपोषण जरी सोडणार असलो तरी पाच राज्यात जाऊन लोकांचे जन जागरण करणार आहेत. तसेच भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचे आणि भ्रष्ट लोकांना मतदान न करण्याचे आवाहन करणार असल्याचे अण्णांनी या वेळी सांगितले.

 

मुंबईतील उपोषण सोडणार असले तरी ३० डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करणार असल्याचेही अण्णांनी स्पष्ट केले.

 

 देशातील बरेचसे तरुण जेल भरो करण्यासाठी तयार आहेत. परंतु लोकसभेत काल लोकपाल विधेयकाला घटनात्मक मंजुरी मिळाली नाही. तसेच आता राज्यसभेतही संसदेतील कुठल्याही पक्षात सहमती होत नाही. त्यामुळे आता जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही. त्यामुळे जेलभरो आंदोलनाऐवजी आता मतदार जागृती अभियान पाच राज्यात राबविण्यात येणार आहे असल्याचे अण्णांनी जाहीर केले. तसेच दोन वर्षांनंतर सार्वत्रिक निवडणुकांमध्येही मतदार जागृती अभियान राबविणार असल्याचेही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.