महाराष्ट्रात एक गाव आहे 'डाळिंबाचं कॅलिफोर्निया'

सांगोला तालुक्यातील अजनाळे गाव हे डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत ओळखले जाते. पाण्याच्या प्रमाण कमी असताना, गावात पाटाचं पाणी नसताना अजनाळे गावाने ही किमया करून दाखवली आहे.

Updated: Jul 5, 2016, 07:16 PM IST
महाराष्ट्रात एक गाव आहे 'डाळिंबाचं कॅलिफोर्निया' title=

सोलापूर : सांगोला तालुक्यातील अजनाळे गाव हे डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत ओळखले जाते. पाण्याच्या प्रमाण कमी असताना, गावात पाटाचं पाणी नसताना अजनाळे गावाने ही किमया करून दाखवली आहे.

 पाण्याचे कोणतेही स्रोत नसताना केवळ पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले, हे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून डाळिंबाला वापरून अजनाळे गावाने दुष्काळातही हरितक्रांती केली आहे. 

अजनाळे गावाची ओळख डाळिंबाचा कॅलिफोर्निया आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे गाव आदर्श मॉडेल मानले जात आहे. डाळिंबाच्या उत्पन्नातून सरासरी वार्षिक ५० कोटींची उलाढाल होत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. 

सांगोल्यापासून सोळा कि.मी. अंतरावरील ४ हजार ५०० लोकसंख्येचे अजनाळे गाव आहे.  ३२५ शेततळ्यांच्या सुमारे ५०० कोटी पाणीसाठ्यामुळे अजनाळे गाव चांगली वॉटरबँक झाले आहे. 

 शेतकऱ्यांनी स्वखर्चातून १ कोटी, १.५ कोटी, २.५ कोटी लिटर पाणी क्षमतेची जवळपास २७६ शेततळी निर्माण करुन पाणी टंचाईला पर्याय शोधला आहे. 

गावाचे भौगोलिक क्षेत्र २ हजार २२७ हेक्टर उंचवट्यावर विखुरलेले आहे. गावातील २ हजार ७० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे. तसेच २९१ हेक्टर निव्वड पडीक क्षेत्र आहे. 

गावात १ हजार ६१२ सातबाऱ्याचे खातेदार असून २ हजार २२७ हेक्टरपैकी १ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाच्या बागा लागवडीखाली आहेत. तर इतर क्षेत्रावर रब्बीमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, मका, चारा आदी पिके तर खरीप हंगामामध्ये बाजरी, मका, चारा आदी पिके घेतली जातात. 

या गावाला पावसाळ्यातील पाण्याव्यतिरिक्त कॅनॉल, योजना अगर प्रकल्पांतून कोणत्याही पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पावसाळ्यात पडलेले पाणी अडवून दुष्काळातही पाणीटंचाईवर मात केली आहे. 

शेतकऱ्यांनी पाण्याचे महत्त्व ओळखून सन १९८४ पासून शंभर टक्के ठिबक सिंचनाद्वारे शेती व्यवसायावर भर दिला आहे. 

‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेतून गावातील ओढ्यावर दहा सिमेंट बंधारे, रोजगार हमी योजनेतून सत्तावीस पाझर तलाव, नव्वद नाले घेऊन पाणी टंचाईवर मात केली आहे. 

साधारण १ कोटी लिटर शेततळ्याच्या पाण्यावर २५ एकर डाळिंबाची बाग ठिबक सिंचन अंतर्गत ओलिताखाली येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळ्यावर अधिक भर दिला आहे. 

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात फळ काढणीचा बहार असल्याने पाण्याची आवश्यकता असल्यामुळे शेततळ्यातील पाणी उपयुक्त ठरते. म्हणूनच गावात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत (एन.एच.एम.) सन २०१२-१३, १३-१४ मध्ये ६४ सामूहिक शेततळ्यांना मंजुरी घेतली होती. पैकी २ कोटी १९ लाख खर्चून ४२ शेततळी पूर्ण केली आहेत.