हंडाभर पाण्यासाठी दोन दिवस ताटकळत, लातूरकर हैराण

 दोन-दोन दिवस नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी ताटकळत राहावं लागतय

Updated: Jun 4, 2019, 06:14 PM IST
हंडाभर पाण्यासाठी दोन दिवस ताटकळत, लातूरकर हैराण  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात सध्या सर्वत्रच भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरु आहे. रेणापूर तालुक्यातील माकेगाव येथे तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना आधार असलेल्या एकमेव बोअरवर अवलंबून राहावे लागत आहे. ज्यात त्या बोअरचे पाणी कमी झाल्यामुळे दोन-दोन दिवस नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत आहे. 

लातूर जिल्ह्यातील एकमेव चारा छावणीचेही मोठं नुकसान झालं आहे. अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे जैन मुनिश्री विनम्रसागरजी महाराज यांच्या दिव्य ज्योत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ९७५ जनावरांची एकमेव चारा छावणी सुरू आहे. अचानकपणे सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सावलीसाठी केलेले शेड नेट आणि लावलेले खांबही उडून गेले. तर जनावरांसाठी साठवून ठेवलेला चाराही उडून गेला. त्यानंतर काही काळ अवकाळी पाऊस पडल्यामुळे उर्वरित चाराही भिजून गेला. यामुळे जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झालं आहे.

वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे चारा छावणीचे नुकसान

या चारा छावणीत खंडाळी, धसवाडी, अंधोरी, येस्तार, पार, डूमनरवाडी, उमटवडी, पांढरेवाडी, कोपनरवाडी, घंटग्रा, गंगा हिप्परगा, नागझरी, उजना, वंजारवाडी, हाळी, हंडरगुळी, टाकळगाव, सुमठाणा या अहमदपूर तालुक्यासह उदगीर तालुका आणि शेजारील परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील जनावरे या चारा छावणीत आहेत. सुदैवाने जनावरांना या वादळी वाऱ्याचा कसलाही फटका बसला नाही.   या चारा छावणीला शासनाचा एकाही रुपयांचा निधी मिळालेला नाही. अहमदपूर तालुकासह गंगाखेड, उदगीर तालुक्यातीलही गावची जनावरे या चारा छावणीमध्ये आहेत.