विजय वडेट्टीवारांनी काढला बाबासाहेबांचा धर्म; मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर...

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या एका विधानानं खळबळ माजलीय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी वडेट्टीवारांनी विधान केलंय.

Updated: Nov 20, 2023, 11:11 PM IST
विजय वडेट्टीवारांनी काढला बाबासाहेबांचा धर्म;  मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर...  title=

Vijay wadettiwar : बाबासाहेब आंबेडकर आणि मुस्लीम धर्माविषयी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय.. बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर देशाचे दोन तुकडे झाले असते, असं वड़ेट्टीवारांनी म्हटलंय.. ते परभणीत बोलत होते. परभणीत थायलंड इथल्या सहा फूट उंचीच्या पन्नास बुद्धरूप मूर्तीचे वितरण करण्यात आलं. वैश्विक धम्मदेशनाचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्याला विजय वडेट्टीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी बाबासाहेबांनी हे वक्तव्य केलंय.

असं म्हणतात की त्यावेळी बाबासाहेबांसमोर बौद्ध धर्मासह मुस्लिम, ख्रिश्चन, शिख धर्मात सामील होण्याचा पर्याय होता. मात्र बाबासाहेबांनी त्यावेळी बौद्ध धर्मच स्वीकारला. महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या मागणीनं राजकारण पेटलंय. मराठा-ओबीसी समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. त्यात विजय वडेट्टीवारांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल विधान करत नव्या वादाला तोंड फोडलंय.

बाबासाहेबांच्या डोक्यात जर मुस्लिम धर्म स्वीकारायचा विचार आला असता तर भारताचे दोन तुकडे करावे लागले असते, असं वादग्रस्त वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय. तर दुसरीकडे मंदिरातील पुजाऱ्यांबद्दलही वडेट्टीवारांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. मंदिरातल्या दानपेट्या काढल्या तर मंदिरांमध्ये पुजारी राहणार नाहीत, असं ते म्हणालेत. 

25 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीची मुंबईत 'संविधान सन्मान महासभा'

वंचित बहुजन आघाडीकडून येत्या 25 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर "संविधान सन्मान महासभे"चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानाने या देशातील शोषित, वंचित, अल्पसंख्यांक, दलित - आदिवासी, ओबीसी व धार्मिक समुह या सर्वांच्या हक्क अधिकारांचे संरक्षण केले आहे. समता, बंधुता आणि न्यायाची हमी दिली आहे. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीच्यावतीने संविधान सादर केले. व संविधान आणि येणारी परिस्थिती व त्यावरील उपाय यावर उहापोह करणारे भाषण केले. त्या भाषणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन या संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की,  संविधान सन्मान महासभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण द्यावे असा निर्णय आमच्या राज्य कार्यकारिणीत झाला आहे. त्यामुळे त्यांनाही आम्ही निमंत्रण पाठवणार आहोत. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील निशाना साधला.  २०२४ च्या लोकसभा निवडणुका या विकास, आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण इत्यादी मुद्द्यांवर लढवले जाईलच मात्र, आरएसएसचा अजेंडा असा आहे की, इथे आमची व्यवस्था हवी आहे, यातील ‘आमची’ हा शब्द फसवा आहे. ते वैदिक व्यवस्था मानतात. त्यांच्या व्यवस्थेत बंधुत्व, स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य  नाही. आरएसएसला वैदिक धर्मावर आधारित संविधान पाहिजे आहे. आताचे भारतीय संविधान हे संतांच्या भूमिकेला आणि फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आहे. असे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीच्या सभांचा धडाका सुरू आहे. ह्या सभांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 25 ऑक्टोबर रोजी अकोला येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला लाखोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. तर त्यानंतर धुळे, सटाणा या ठिकाणी आदिवासी हक्क परिषद मोठ्या संख्येने पार पडल्या होत्या आणि आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर येथील छ. शिवाजी महाराज मैदानावर ही महासभा होणार आहे.  संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या ह्या सभेला अत्यंत महत्त्व आहे. देशभरात संविधानिक संस्था, लोकशाही धोक्यात असतांना महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर संविधानाच्या सन्मानार्थ महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. 

मुंबईभरातून मोठ्या प्रमाणात ह्या सभेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संविधान प्रेमी जनतेकडून प्रचार जोरात सुरू असून ही महासभा देशातील संविधान प्रेमी जनतेला एक नवीन दिशा देणारी सभा ठरेल. मोठ्या संख्येने संविधान सन्मान महासभेत नागरिक सहभागी होतील.