इंदर भाटिया हत्या प्रकरण : पप्पू कलानीला जन्मठेप

इंदर भटिजा हत्याप्रकरणात उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कल्याण सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 3, 2013, 02:08 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
इंदर भटिजा हत्याप्रकरणात उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कल्याण सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय. पप्पू कलानीसह इतर तीन आरोपींनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
पप्पू कलानी याच्यासोबतच बच्ची पांडे, बाबा गॅब्रिएल आणि हर्षद ताहीर शेख यांनाही दोषी करार दिलं गेलंय.
२७ फेब्रुवारी १९९० रोजी घनश्याम भटिजा नावाच्या एका व्यक्तीला उल्हासनगरमध्ये हॉटेल पिंटो पार्कच्या बाहेर रस्त्यावरच गोळी मारून हत्या केली होती. पप्पू कलानी यानं दिलेल्या आदेशावरून बच्ची पांडे, बाबा गॅब्रिएल आणि हर्षद ताहीर शेख यांनी आपल्या आणखी काही सहकाऱ्यांसोबत या घटनेचा साक्षीदार असलेला घनश्यामचा भाऊ इंदर भटिजा याची २८ एप्रिल १९९० रोजी सकाळी उल्हासनगरमधील बर्नल कारखान्यात घुसून गोळी मारली होती. महत्त्वाचं म्हणजे घटनेच्या वेळी इंदर भटिजा याला पोलीस सुरक्षाही प्रदान केली गेली होती.
त्यानंतर आरोपींना अटकही झाली होती. पण, बचाव पक्षाच्या वकिलांनी पप्पू कलानीला जामीनावर तुरुंगातून बाहेर काढलं. त्यानंतर इतर आरोपींनाही जामीन मिळाला. याच प्रकरणाचा तब्बल २३ वर्षांनी निकाल लागलाय. यामध्ये चौघे जण दोषी आढळले. तर दोघांवरचे आरोप सिद्ध न झाल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. पप्पू कलानी याआधीही बरेच वर्ष तुरुंगात राहिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.