नारायण राणे म्हणतात, आमच्यामुळे शिवसेना सत्तेत...

भाजपाच्या मागे लागाल, तर पुराव्यासह वाभाडे काढू, नारायण राणे यांचा इशारा

Updated: Feb 16, 2022, 05:30 PM IST
नारायण राणे म्हणतात, आमच्यामुळे शिवसेना सत्तेत... title=

मुंबई : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मुंबईतल्या भाजप कार्यालयात पत्रकार परिदष घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर एकेरी भाषेत उल्लेख करत वाभाडे काढले. 

संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली होती, त्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी समाचार घेतला. आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती आरोप केले.  

माझ्यावर बाळासाहेबांचे आशिर्वाद आहेस असं म्हणतोस, लायकी आहे का तुझी साहेबांबद्दल बोलायची, आणि याच्यावर साहेबांचे आशिर्वाद तुझ्या सारख्याला, साहेबांबद्दल बोललेलं मी आयुष्यात कधी ऐकुन नाही घेतलं. एवढं घाणेरडं बोलला आहे, आता फक्त पदासाठी आलाय आणि पैशे कमवायला आला आहे. कुठे होता, कसा होता, कसा पहिले झोळी घेऊन फिरायचा, मी  पाहिलंय, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या जन्मानंतर २६ वर्षांनंतर हा पक्षात आला. शिवसेना भवनासाठी तुझे पाच पैसे तरी आहेत का, आम्ही शिवसेनेसाठी एवढं केल म्हणून सत्ता आहे. एकतरी केस तुझ्या नावावर आहे का. उसनं अवसान कशासाठी, त्यासाठी रग लागते, रक्त लागतं, तुझ्यात काही नाही भेसळ आहे, अशी जोरदार टीका नारायण राणे यांनी केली आहे. 

'सामनातला पगारी नेता'
संजय राऊत यांचे प्रवीण राऊतशी काय संबंध आहेत, किती व्यवहार केलेस, अजून बरंच बाहेर यायचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप तुझं काम नाहीए, पगारी नेता आहेस तू. सामनातून  पगार घेतोस, त्यावर अधिक कमवतोस असे आरोप करत नारायण राणे यांनी प्रवीण राऊत याच्या चौकशीनंतर आता आपण पण अडचणीत आहोत, आपल्याला आज उद्या अटक होणार, अनिल परबलाही होणार आणि म्हणून भाजपाच्या साडेतीन नेत्यांना आत घालणार,  अरे एकाचं तरी नाव सांग ना. आता आम्ही तुझं नाव सांगितलं, अनिल परबचं सांगितलं, आता तू सांग ना, असं आव्हान दिलं आहे. 
 
जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
राज्यात लोकांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न इतके आहेत,  एकवेळेला हेच मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरायचे, मी सातबारा कोरा करेन, सत्ता द्या, आता सत्ता दिली, आता सातबाराच दिसत नाही. शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार मी देईन, किती दिलेत तुम्ही. यावर बोलतं हे सरकार. २१-२२ वर्षाचं पर कॅपिटल इन्कन खाली आलं आहे. काय पुण्याई आहे बघा यांची, विकासावर बोला, ते बोलत नाही हा माणूस. राज्याची दैनीय अवस्था आहे, बेकारी वाढतेय, एसटीचा संप मिटत नाहीए, इंडस्ट्रीयल मिनिस्टर पत्राचाळीतून बंगल्यात गेले, कंबोज यांनी सांगितलं, २५ लाखांचा चेक संजय राऊत दिला, यावर बोल आता असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

अजून बरंच काही निघायचं आहे, ईडीविषयी बोलू नको बिडी प्यायला लावतील, मी कोणाला घाबरत नाही, हे सरकार भाजपाच्या मागे लागल्यास यांचे सर्व वाभाडे पुराव्यासकट आम्ही देणार, आम्ही ईडी, सीबीआयकडे ते पोहचवू, असा इशारा राणे यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची देशात आज लाजीरवाणी परिस्थिती कोणी आणली असेल तर आताच्या सत्तारुढ पक्षाने.  हे सर्व झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप सुरु आहेत. असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.