'दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही, महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच'

यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Updated: Nov 5, 2019, 10:20 AM IST
'दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही, महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच' title=

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात दिल्लीतील भेटीसंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलेल. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही. महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, असे राऊत यांनी सांगितले. 

सत्तास्थापनेचा घोळ घालून नियंत्रण स्वत:कडे ठेवणे घटनाविरोधी- शिवसेना

शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत दररोज पत्रकारपरिषद घेऊन भाजपला नवनवे इशारे देत आहेत. आजच्या पत्रकारपरिषदेतही त्यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडली. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाचा प्रमुख नेता हालचाली करत आहे. सत्तास्थापनेत केवळ एकाच पक्षाची भूमिका असल्याचे चित्र आता बदलले आहे. कारण, यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शिवसेनेच्या आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार. शपथविधी ही कोणाची मक्तेदारी नाही, असे राऊत यांनी म्हटले. 

साहेब आपण करून दाखवलं; मातोश्रीबाहेर झळकले पोस्टर्स

तत्पूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तूनही आज भाजपच्या भूमिकेवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा, हे घटनाविरोधी असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.