दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी आज जालना जिल्ह्यातल्या साळेगाव इथल्या चारा छावणीला भेट दिली.

Updated: Jun 9, 2019, 02:13 PM IST
दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत - उद्धव ठाकरे  title=

जालना : दुष्काळ संपेपर्यंत शिवसेना जनतेच्या पाठिशी राहणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहे. उद्धव ठाकरेंनी आज जालना जिल्ह्यातल्या साळेगाव इथल्या चारा छावणीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना अन्नधान्याचे वाटप केले. आधीच्या सरकारने प्रकल्प पूर्ण करून सत्ता नीट राबवली असती तर आता जनतेला रस्त्यावर फिरण्याची गरज पडली नसती असा टोला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीला लगावला.

कर्जमुक्ती अजून शेतकऱ्यांपर्यंत गेली नाही, तो आमचा हट्ट आहे, तो कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणार. पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी शिवसेना समर्थ असल्याचेही ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांसाठी निधी कमी पडला तर पंतप्रधानांकडे मदत मागू असे आश्वासन त्यांनी दिले. तर खैरेंचा पराभव हा आमचा पराभव असून हा पराभव आमच्या जिव्हारी लागलाय. पुन्हा शहरावर भगवा फडकवणार असल्याचा संकल्प उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.

तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हांला मदत करणे ही माझी जबाबदारी आहे. लोकसभेला तुमची मते घेऊन मी मोकळा झालो. आता तुम्हाला मदत करणे माझे काम आहे. तुमचा आशीर्वाद मिळत नसेल तर पक्षप्रमुख म्हणून मी नालायक असेल असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.