महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथं आहे मोठ धरण आणि धो धो कोसळणारा धबधबा; ऐतिहासिक महत्व थक्क करणारे

 नळदूर्ग किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्यात एक धरण आहे आणि धरणामध्ये पाणीमहल आहे. 

वनिता कांबळे | Updated: Mar 3, 2024, 10:21 PM IST
महाराष्ट्रातील एकमेव किल्ला जिथं आहे मोठ धरण आणि धो धो कोसळणारा धबधबा;  ऐतिहासिक महत्व थक्क करणारे title=

Naldurg Fort : महाराष्ट्रातील गड किल्ले इतिहासाचे साक्षीदार आहेत. प्रत्येक किल्ला हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात असाच एक किल्ला जिथे ज्या किल्ल्यात धरण आहे  आणि धरणात महाल असलेला जोडकिल्ला आहे. नळदुर्ग असे या किल्ल्याचे नाव आहे.  नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे.  धाराशिव म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद जिल्ह्यात नळदुर्ग किल्ला आहे. 
महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला

अतिशय मजबूत तटबंदी असलेला नळदूर्ग किल्ला काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला आहे. या किल्ल्यात 114 बुरुज आहेत.  परांडा बुरुज, उपळा बुरुज आण्णाराव बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज अशा विविध नावांनी ही बुरुजे ओळखली जातातय  परांडा बुरुज हे किल्ल्याच्या उत्तर-पूर्व बाजूला आहे. या बुरुजावरुन त्याकाळी मोठा झेंडा किंवा मशालीच्या सहाय्याने परांडा येथील किल्ल्यातील लोकांना संदेश दिला जाई असे म्हणतात. नळदुर्ग आणि रणमंडळ अशा दोन किल्ल्यांना जोडून बनवण्यात आलेला हा किल्ला अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या किल्ल्यात करण्यात आलेलं पाण्याचं व्यवस्थापन तसेच खरोखर अभ्यास करण्याजोगा विषय आहे. नळदुर्ग किल्ला तिन्ही बाजुंनी पाण्याने वेढलेला आहे. या किल्ल्याच्या चौथ्या बाजूला खोल दरी आहे. नळदुर्ग किल्ला ज्या डोंगरावर बांधण्यात आला आहे  त्या डोंगराला चारही बाजूंनी इतर डोंगरांचं संरक्षण आहे. यामुळे नळदुर्गच्या  जवळ गेल्याशिवाय हा किल्ला दिसतच नाही. हा किल्ला सुमारे तीन किलोमीटरवर पसरलेला आहे. या किल्ल्यात असलेला पाणीमहाल अत्यंत प्रेक्षणीय आहे. किल्ल्याजवळूनच बोरी नदी वाहते. या नदीचं संपूर्ण पात्र वळवून त्याचा उपयोग किल्ल्याच्या रक्षणासाठी करण्यात आला आहे. पावसाळ्यात या किल्ल्यातून नर-मादी धबधबे प्रवाहित होतात.  किल्ल्यातून हाणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.  हुलमुख दरवाजा हा किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. नळदुर्गच्या किल्ल्याची रचनाच शत्रूला चकवा देण्यासाठी केली गेलीय हे या गडाच्या दरवाजावरूनच कळतं.

असा आहे नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास

तारीख-ए-फरिश्ता ग्रंथात नळदुर्ग किल्ल्याचा उल्लेख आहे.  नल-दमयंतीशी देखील याचा संबध  जोडला जातो. नळदुर्ग हा किल्ला राजा नळ याने आपल्या मुलासाठी बांधला.  हा किल्ला काही काळ चालुक्य राजाकडे होता. त्यानंतर तो बहामनी सुलतानांच्या ताब्यात गेला. बहामनी राज्यांच्या विघटनानंतर हा किल्ला आदिलशाहाच्या ताब्यात गेला. यानंतर मुघल आणि निजामांकडे देखील हा किल्ला होता. इ. स. 1758 मध्ये हा किल्ला नानासाहेब पेशवे यांनीही जिंकला. इ.स. 1799 मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला. त्यानुसार फ्रेंच सैनिकांऐवजी इंग्रजांचे सैनिक ठेवण्याचे ठरले. या तहाने इंग्रजांचे वर्चस्व हैद्राबादेत प्रस्थापित झाले आणि निजामाचे स्वातंत्र्य संपले.

नळदुर्ग किल्ल्यावर कसे पोहचाल?

धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर  नळदुर्ग किल्ला आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर 48  कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव आहे. धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर मार्गे नळदुर्ग येथे जाता येते.  जवळचे रेल्वेस्थानक सोलापूर आहे. नळदूर्ग येथे असणारा ऐतिहासिक नळदूर्ग किल्ला हा स्थानिक बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आहे.