'मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही...', 'पछाडलेला' फेम अभिनेत्री असं का बोलून गेली?

अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोणावर व्यक्त केला संताप...

दिक्षा पाटील | Updated: Jun 29, 2024, 02:04 PM IST
'मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही...', 'पछाडलेला' फेम अभिनेत्री असं का बोलून गेली?   title=
(Photo Credit : Social Media)

'बाबा लगीन', 'मालक - मालक', 'पछाडलेला' या चित्रपटातून आपल्या सगळ्यांच्या मनात छाप सोडणारी अभिनेत्री म्हणजे अश्विनी कुलकर्णी... अश्विनीनं विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. तिला गेल्या अनेक वर्षांपासून आपण सगळे आपलं मनोरंजन करताना पाहतोय.  दरम्यान, आता अश्विनीनं कोणाचं ही नाव न घेता मराठी मनोरंजन जगात आलेला एक विचित्र अनुभव सांगितला आहे. 

अश्विनीनं तिला आलेल्या अनुभवाविषयी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. याविषयी अश्विनी म्हणाली, "माननीय... एखाद्या कलाकृतीचं आपण मुख्य भाग असणं.. आणि ती प्रदर्शित होणं ही प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यातील खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट असते... आणि असं सुख मला देवानं खूप दिलंय. यापुढेही देव मला असं सुख देत राहो ही प्रार्थना." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

"दरम्यान, मला अशाच एका कलाकृती निमित्तानं आलेला एक विचित्र अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे... मुद्दाम कलाकृतीचं नाव घेत नाही, कारम कशाला उगाच कोणाचंही नाव काही कारण नसताना प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध करायचं आणि होऊ नये हाच प्रामाणिक हेतू आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्यात एका चित्रपटाचं शूटिंग केलं... त्यावेळी दोन निर्मात्यांमधील भांडणं, निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यात वाद, अशा अनेक गोष्टी घडत असल्यामुळे तो चित्रपट हा अपूर्णच राहिला होता. अखेर चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजेभोसले यांच्या मध्यस्थीने आणि पाठिंब्याने तो चित्रपट पूर्ण झाला. मेघराज भैय्या हे खरंच वडील बंधू यांच्या प्रमाणे होते. त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन मी आणि बहुदा इतर कलाकारांनी ही निर्मात्यांना सहकार्य करत चित्रपट पूर्ण केला." 

अश्विनी याविषयी पुढे सांगत म्हणाली की "सदर निर्माता असे दोन्ही का तिन्ही यांना दिग्दर्शकांना या चित्रपटाच्या कोणत्याही प्रमोशन्ल अॅक्टिव्हिटी इतकंच काय तर प्रीमियरला सुद्धा कोणत्याही मुख्य अभिनेत्रीला बोलावण्याटी औपचारिकता दाखवता आली नाही. आता इतकंच नाही तर चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख बदलली. मुख्य अभिनेत्रीला हे कळवायला हवं असं वाटलं नाही का... या सगळ्याचं मला काही वाटत नाही पण या सगळ्यामुळए पुढे काय करावं असा प्रश्न मला पडला होता." 

हेही वाचा : शत्रुघ्न सिन्हा रुग्णालयात दाखल, सोनाक्षीच्या लग्नात 5 दिवस आधी लावली होती हजेरी

"अडकलेला चित्रपट पुर्ण करून, वेळेत त्याचे डबिंग करून, माझ्याकडून अपेक्षित असलेले सहकार्य करून ही जेव्हा आपण वगळले जातो, तेव्हा थोडं वाईट वाटलं इतकंच. माझ्यासारख्या अनेक कलाकारांनी हे अनुभवलं असेलच.. तेव्हां या 'वाटण्याची' थोडी देवाण घेवाण करावी या साठी हा पोस्ट प्रपंच. तेव्हा आता या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मी माझी नवीन मालिका, आणि आगामी चित्रपट यांच्या कामात स्वतःला व्यस्त करून घेतलं आहे... शेवटी रंग बदलणाऱ्या लोकांकडे लक्ष देण्या पेक्षा... चेहेऱ्याला लागलेल्या रंगाशी माझं इमान राखून ठेवण्यात मी आग्रही आहे...ही रंगदेवता माझ्यावर सतत प्रसन्न रहो.. आणि रसिकांचे आशिर्वाद पाठीशी राहोत हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना... बाकी..चलता है"