'...त्या क्षणी मी क्रिकेट सोडून देणार', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'मला संघात स्थान...'

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने आपण कोणत्या क्षणी क्रिकेटमधून संन्यास घेणार आहोत याचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 3, 2023, 06:09 PM IST
'...त्या क्षणी मी क्रिकेट सोडून देणार', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, 'मला संघात स्थान...' title=

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज रवींचंदन अश्विनची दक्षिण आफ्रिकेविरोधातील दोन कसोटी सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. 26 डिसेंबरपासून ही मालिका सुरु होणार आहे. विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात जागा मिळालेल्या आर अश्विनला एकदिवसीय आणि टी-20 संघातून मात्र वगळण्यात आलं आहे. 37 वर्षीय आर अश्विनला वर्ल्डकपमध्ये फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. यामुळे आर अश्विनचं भवितव्य सध्या अनिश्चित असल्याची चर्चा आहे. यादरम्यान आता आर अश्विनने आपण क्रिकेटमधून कधी संन्यास घेणार याचा खुलासा केला आहे. 

आर अश्विनने ज्यादिवशी आपण प्रेरणा गमावू त्यादिवशी अंतिम निर्णय घेऊ असं सांगितलं. "मी मागील पाच वर्षांपासून क्रिकेटनंतरच्या आयुष्यासाठी तयारी करत आहे. पण मी माझ्या क्रिकेटवर कठोर परिश्रम घेत आहे. फलंदाजीत योगदान देता यावं यासाठी देण्यासाठी मी अमेरिकेला गेलो आणि बेसबॉलचा सराव केला. ज्या दिवशी मी प्रेरणा गमावेन किंवा सकाळी उठून बॉलिंग किंवा बॅटिंग करण्यची चीड येईल तेव्हा मला आता सर्व संपलं हे याची जाणीव होईल. त्यानंतर मी लगेच क्रिकेट खेळणं सोडेन, सर्वांचे आभार मानेन आणि आयुष्यातील पुढील अध्यायाकडे जाईन," असं तो पुढे म्हणाला. भारताचे माजी फलंदाज एस बद्रीनाथ यांना त्यांच्या 'क्रिक इट विथ बद्री' या यूट्यूब चॅनेलवर मुलाखत देताना त्याने हे सांगितलं.

आर अश्विनने काही वर्षांपूर्वी आपल्या आयुष्यात फार खडतर टप्पा आला होता असं सांगताना त्याचा सामना करताना मानसिक आरोग्य नीट राहावं यासाठी मदत घेतल्याचा खुलासा केला. "मी मुत्सद्दी होण्याचा प्रयत्न करत नाही. पण चार ते पाच वर्षं (2019 पासून), मी स्वतःला आयुष्यातील एका खडतर टप्प्यात सापडलेलं पाहिलं होतं. यानंतर मानसिक आरोग्यासाठीही मदत घेतली. याचा सामना करताना मला आता आपल्याला कोणत्याही प्रसंगासाठी तयार राहावं लागेल याची जाणीव झाली,” असं अश्विनने भारताचे माजी फलंदाज एस बद्रीनाथ यांना त्यांच्या 'क्रिक इट विथ बद्री' या यूट्यूब चॅनेलवर मुलाखत देताना सांगितलं.

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरोधाच 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. भारताने या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. यानंतर भारतीय संघ 3 टी-20, एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. 

3 टी-20 सामन्यांसाठी संघ: 

यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (व्हीसी), वॉशिंग्टन, रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर

3 वनडेसाठी संघ: 

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार) (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चहर.

2 कसोटींसाठी संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद. शमी*, जसप्रीत बुमराह (व्हीसी), प्रसिद्ध कृष्णा.