पाकिस्तानने केलं भारताचं काम अधिक सोपं; पाहा नेमकं कसं!

पाकिस्तानच्या या विजयाचा भारतालाही फायदा झाला आहे. 

Updated: Oct 27, 2021, 08:49 AM IST
पाकिस्तानने केलं भारताचं काम अधिक सोपं; पाहा नेमकं कसं! title=

मुंबई : टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात भारताचा 10 विकेट्सने पराभव केल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने मंगळवारी न्यूझीलंडचाही पराभव केला. पाकिस्तानने न्यूझीलंडचा 5 विकेट्स राखत पराभव केला. तर पाकिस्तानच्या या विजयाचा भारतालाही फायदा झाला आहे. न्यूझीलंडला हरवून पाकिस्तानने भारताचं काम अधिक सोपं केलंय. आता टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवलं तर उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत ती पुढे असणार आहे.

पाकिस्तानने भारताचं काम केलं सोपं

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. न्यूझीलंडवर मात करताच भारताचं काम सोपे होईल. त्यानंतर टीम इंडियाला अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबिया या संघांविरुद्ध सामने खेळावे लागतील. या टीमविरुद्धचे पुढील 3 सामने जिंकून भारत उपांत्य फेरीत पोहोचेल. 

गटातील प्रत्येक टीमला 5 सामने खेळायचे आहेत. पाकिस्तान संघ आपले पाचही सामने जिंकू शकतो. त्याचबरोबर भारत आपले 4 सामने जिंकू शकतो. पण भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे.

भारताला रहावं लागेल सावधान

अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास करू शकणार नाही, पण भारत, पाकिस्तान किंवा न्यूझीलंडसारख्या मोठ्या टीम्सचा खेळ ही टीम खराब करू शकते. अशा स्थितीत भारतीय टीमला सतर्क राहावं लागणार आहे. भारताला विशेषत: अफगाणिस्तानबाबत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. अफगाणिस्तान मोठ्या संघांना पराभूत करू शकतो. 

रविवारी झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय 
टीमने पाकिस्तानचा 10 विकेट्स राखत पराभव केला. या पराभवाने टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, तर टूर्नामेंटमधून बाहेर जाण्याचा धोका संभवू शकतो.