'शुभमन गिल अनाकलनीय, त्याला कशाला कर्णधार...'; भारतीय खेळाडू स्पष्टच बोलला, 'तुम्ही फक्त तो संघात आहे म्हणून...'

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने (Amit Mishra) शुभमन गिलकडे (Shubhman Gill) कर्णधारपद सोपवण्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरोधातील (Zimbabwe) टी-20 मालिकेत शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चांगला पर्याय होता, असं अमित मिश्रा म्हणाला आहे.    

शिवराज यादव | Updated: Jul 16, 2024, 01:06 PM IST
'शुभमन गिल अनाकलनीय, त्याला कशाला कर्णधार...'; भारतीय खेळाडू स्पष्टच बोलला, 'तुम्ही फक्त तो संघात आहे म्हणून...'  title=

Amit Mishra on Shubhman Gill: माजी भारतीय क्रिकेटर अमित मिश्राने (Amit Mishra) शुभमन गिलकडे (Shubhman Gill) कर्णधारपद सोपवण्यावरुन नाराजी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरोधातील (Zimbabwe) टी-20 मालिकेत शुभमन गिलला कर्णधार करण्यात आलं. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताने 4-1 ने टी-20 मालिका जिंकली असली तरी अमित मिश्राने शुभमन गिल कर्णधार म्हणून फारच भरकटलेला दिसतो. त्याला काय करायचं हेच समजत नाही असं तो म्हणाला आहे. शुभमन गिलपेक्षा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) चांगला पर्याय होता, असं अमित मिश्रा म्हणाला आहे.  आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याने गुजरात संघ सोडल्यानंतर शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. शुभमनच्या नेतृत्वात गुजरातने 14 पैकी फक्त 5 सामने जिंकले. गुजरात संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही आणि गुणतालिकेत 8 व्या क्रमांकावर राहिला. 

दिग्गज फिरकीपटूने शुभंकर मिश्राच्या यूट्यूबवरील पॉडकास्टवर परखडपणे आपलं मत मांडताना शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तसंच ऋतुराज गायकवाड चांगला पर्याय होता असंही म्हटलं. "मी शुभमनला कर्णधार कऱणार नाही. कारण मी त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहिलं आहे. त्याला नेतृत्व कसं करायचं हेच माहिती नाही. तो कर्णधार म्हणून अनभिज्ञ आहे," असं अमित मिश्राने सांगितलं.

"फक्त तो भारतीय संघाचा भाग आहे यामुळे त्याला कर्णधार बनवू नये. गिलने गेल्या काही हंगामात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याने भारतीय संघातही चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने त्याला कर्णधार केलं आहे, कारण त्यांना त्याला कर्णधार म्हणून त्यांना नेतृत्वाचा अनुभव द्यायचा आहे, जो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना दिसत नव्हता,” असंही तो म्हणाला.

अमित मिश्राने यावेळी टी-20 संघाचं नेतृत्व करण्यासाठी संजू सॅमसन, ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांचा विचार करु शकतो असं सुचवलं. ऋतुराज गायकवाड झिम्बाब्वे मालिकेसाठी संघाचा भाग होता, तर सॅमसन दुसऱ्या सामन्यापासून संघात सामील झाला होता.

"मी त्याला (शुभमन गिल) आयपीएलमध्ये पाहिले आहे, आणि त्याला कर्णधारपद कसं करावे हे माहित नाही. त्याला कर्णधारपदाची काहीच कल्पना नाही. त्यांनी त्याला कर्णधार का बनवले हा एक प्रश्न आहे. फक्त तो भारतीय संघात आहे, याचा अर्थ त्याला कर्णधार बनवायला हवं असं नाही,” अशी टीकाही त्याने केली.