शिवसेना निवडणूक लढविण्याचे दुकान? - उद्धव

शिवसेनेने ज्यांना ओळख नव्हती त्यांना मोठे केले. मात्र, शिवसेना ही निवडणूक लढविण्याचे दुकान नाही. आता आपण गाफील राहिलो तर हा हिरवा राक्षस आपल्याला खाऊन टाकेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 16, 2012, 09:32 AM IST

www.24taas.com,ठाणे
शिवसेनेने ज्यांना ओळख नव्हती त्यांना मोठे केले. मात्र, शिवसेना ही निवडणूक लढविण्याचे दुकान नाही. आता आपण गाफील राहिलो तर हा हिरवा राक्षस आपल्याला खाऊन टाकेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिलाय.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. शनिवारी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने भेट घेतली. शिवसेना ही एक शक्ती आहे. ती एक दिशा आहे. बाळासाहेबांनी आपले आयुष्य झिजवून दगडाचे सोने केले आणि आता या सोन्याचा अलंकार महाराष्ट्रावर आपण चढवू शकत नाही का, असा सवाल करीत २०१४च्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी यावेळी भावनिक आवाहन केले.
बाळासाहेबांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी खांद्यावर घेतली आहे आणि आता तुम्हालाही त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असेही त्यांनी या वेळी शिवसैनिकांना सांगितले. बाळासाहेबांनी जे काम आपल्यावर सोपविले आहे ते पूर्ण करण्याची वेळ आता आली असून, बाळासाहेब गेल्यानंतर काही जणांना वाटत होते की शिवसेना संपली. परंतु, आपल्याला शिवसेना जिवंत ठेवायची असून, महाराष्ट्रावर भगवा फडकवायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आज महाराष्ट्रात बांगलादेशीयांना आधार कार्ड मिळत आहे, उद्या हेच राज्यकर्ते मतांच्या लाचारीसाठी याच बांगलादेशीयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरदेखील बसवतील. आता आपण गाफील राहिलो तर हा हिरवा राक्षस आपल्याला खाऊन टाकेल, असा इशाराही त्यांनी शिवसैनिकांना दिला.