Tomato Price: टॉमेटो 160 किलोच्या पार! का वाढतेय किंमत? कधी येणार आवाक्यात? सर्वकाही जाणून घ्या

Tomato Price: पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने टोमॅटोची रोपे तयार होण्यासाठी बियाणे पेरले आहे. या बीजाचे १५ ते २० दिवसांत रोप तयार होईल. नंतर रोप उपटून शेतात लावले जाईल. तेथे टॉमेटो तयार होण्यास दीड ते दोन महिने लागतील.

Pravin Dabholkar | Updated: Jul 7, 2023, 01:34 PM IST
Tomato Price: टॉमेटो 160 किलोच्या पार! का वाढतेय किंमत? कधी येणार आवाक्यात? सर्वकाही जाणून घ्या  title=

Tomato Price: टॉमेटोच्या किंमती दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या खिशाला कात्री बसतेय. देशातील प्रमुख शहरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर कुठे 100 ते 120 रुपये प्रतिकिलो तर कुठे 120 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईतील किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 160 रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. काही दिवसांत टोमॅटोचा भाव 200 रुपये किलोपर्यंत पोहोचण्याची भीती व्यापाऱ्यांना आहे.

टोमॅटोचे वाढलेले भाव हे हंगामी महागाई 

टोमॅटोच्या किमतीत सध्याची वाढ ही एक हंगामी बाब आहे आणि यावेळी किमती सामान्यतः जास्त असतात. पुढील 15 दिवसांत किंमती कमी होतील आणि एका महिन्यात सामान्य होईल. देशातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोचा दर 100 रुपये किलोच्या वर राहिला असून, टोमॅटोबरोबरच मिरचीनेही आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांना योग्य भाव मिळतोय

साधारणत: शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला भाव असतानाही केवळ 300 रुपये प्रति क्रेट भाव मिळतो. सध्या टोमॅटोचा भाव 100 रुपयांच्या पुढे गेला असताना शेतकऱ्यांकडून टोमॅटोचा एक क्रेट एक हजार ते 1400 रुपयांपर्यंत विकला जात आहे. 

यूपीमध्ये टोमॅटो पिकवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गावातील शेतकरी सांगतात की, पूर्वी उन्हाळ्याच्या हंगामात ते टोमॅटो घेऊन मंडईत जात असत. मात्र यावेळी बाहेरून व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी आले आहेत. घाऊक व्यापाऱ्यांशिवाय अनेक मोठ्या कंपन्यांचे कर्मचारीही टोमॅटो खरेदीसाठी पोहोचत आहेत.

योग्य भाव मिळायला तीन महिने लागतील?

बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील टोमॅटोचे शेतकरी हेमंत सांगतात की दिवाळीच्या आसपास टोमॅटोचे भाव परवडणारे असतील. पावसाळ्याच्या पहिल्या पावसाने टोमॅटोची रोपे तयार होण्यासाठी बियाणे पेरले आहे. या बीजाचे १५ ते २० दिवसांत रोप तयार होईल. नंतर रोप उपटून शेतात लावले जाईल. तेथे टॉमेटो तयार होण्यास दीड ते दोन महिने लागतील.

मोदी सरकारला प्रश्न 

उद्धव ठाकरे गटाने महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. 'सामना'च्या अग्रलेखामधून महागाईवरून यूपीए सरकारच्या नावाने ठणाणा करीत मोदी सरकार 9 वर्षांपूर्वी सत्तेत आल्यानंतर चित्र फारसे बदलेले नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. टोमॅटोचे दर 150 वर गेलेत तर अनेक भाजांनी त्रिशतक गाठलं असलं तरी केंद्रातील सरकार ढीम्म असल्याचा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. टोमॅटोच्या शेतांवर डाका घालण्यात येत असल्याची प्रकरण समोर येत आहे तर टोमॅटो आता केवळ मिम्स आणि रिल्सपुरता मर्यादीत राहिला असून तो पेट्रोलपेक्षाही महाग झाला असल्याचं म्हणत ठाकरे गटाने या वाढत्या महागाईबद्दल चिंता व्यक्त केली आहे.