कोरोनाची लागण झालेल्या आर्थर रोडमधील कैद्यांना क्वारंटाईन

उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली 

Updated: May 11, 2020, 01:27 PM IST
कोरोनाची लागण झालेल्या आर्थर रोडमधील कैद्यांना क्वारंटाईन  title=

मुंबई : आर्थर रोड जेलमधील ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झालीय त्यांना बाहेर क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आतापर्यंत ५ हजार कैद्यांना सोडण्यात आलंय. तसेच अजून काही कैद्यांना पॅरोलवर सोडता येईल. तर काहींच्या पॅरोलमध्ये वाढ देखील करण्यात आली आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती दिली. 

त्याबाबत आज उच्चस्तरीय बैठक आहे. या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. सात किंवा आठ वर्षापर्यंत शिक्षा झालेल्या कैद्यांना सोडण्याबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. राज्यात ३८ हजार कैदी विविध जेलमध्ये आहेत. अनेक पोलीसांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे.  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस कर्मचाऱ्याला त्रास झाला तर त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा राखीव ठेवलेल्या आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्ये कोरोनावीरांचा देखील समावेश आहे. डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटाचा सामना करत आहेत. या संकटाचा सामना करताना आतापर्यंत सात पोलिसांनी आपले प्राण गमावले असून तब्बल ७८६ पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे. 

७६ पोलिसांनी करोनावर मात केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. मागील २४ तासांत राज्यात तब्बल दीडशे पोलिसांना करोनानं ग्रासलं आहे.  एकट्या मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांची संख्या अडीचशेच्या घरात आहे. करोनाची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे पोलिस दलात अस्सवस्थ वातावरण निर्णाण झालं आहे.