मुंबई : बीडीडी चाळीत एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपीने स्वतःच दिली पोलिसांना माहिती

Mumbai Crime : वरळीतील बीबीडी चाळीत एका व्यक्तीची अंतर्गत वादातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने कोयत्याने हल्ला करुन एकाला संपवलं आणि त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

आकाश नेटके | Updated: Aug 16, 2023, 09:59 AM IST
मुंबई : बीडीडी चाळीत एकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; आरोपीने स्वतःच दिली पोलिसांना माहिती   title=

Mumbai Crime : वरळीच्या (Worli) बीडीडी चाळीत (BDD Chawl) स्वातंत्र्यदिनीच एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळीतील बीडीडी चाळीत संध्याकाळच्या सुमारास हा सगळा खळबळजनक प्रकार घडला आहे. आरोपीने कोयत्याने हल्ला करुन एकाची हत्या केली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर थेट पोलीस ठाणे (Mumbai Police) गाठलं आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. या हत्येनंतर बीबीडी चाळीत एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला जवळच्या केईएम रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

विनोद साळुंखे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर गिरीश जाधव असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार विनोद आणि गिरीश हे दोघेही एकमेकांना ओळखत होते. संध्याकाळच्या सुमारास बीडीडी चाळ क्रमांक 5 येथे खूनाची घटना घडली. आरोपी गिरीशने विनोद साळुंखेवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात साखुंळे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हत्येनंतर आरोपी गिरीश जाधव हा जवळच्या पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घडलेला सगळा प्रकार सांगितला. गिरीशचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ गिरीशला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. अंतर्गत वादातून खून झाला असल्याची माहिती आरोपीने स्वत:हून पोलिसांना पोलीस ठाण्यामध्ये दिल्याचे म्हटलं जात आहे.