'... तर सरकार कोसळेल', खासदार संजय राऊत यांचं भाकीत

 15 दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही?, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Updated: Jul 17, 2022, 11:46 AM IST
'... तर सरकार कोसळेल', खासदार संजय राऊत यांचं भाकीत title=

मुंबई : शिवसेना विरुद्ध शिवसेना असा आता महाराष्ट्रात वाद सुरू आहे. शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असं राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आता ठाकरे गटातील नेते, कार्यकर्ते पुढे येत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

घटनेचा पेच निर्माण झाल्यानंच मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिंदे गट आणि फडणवीस यांच्या युतीवर त्यांनी निशाणा साधला आहे. 15 दिवसांनंतरही मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार हा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता त्यावर संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. 

एकनाथ शिंदेंनी विकास निधी थांबवणे चुकीचं आहे. विकास कामांसाठी निधी दिला असेल तर थांबवणे योग्य नाही. शरद पवार यांच्या घरी आज विरोधकांची बैठक आहे. उपराष्ट्रपती निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी आयोजित केली बैठक. 

मला घटनाच नव्हे तर दुर्घटना पण माहीत आहे. घटनेला नैतिकतेचा आधार असतो. हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभं आहे का? १५ दिवसा नंतरही मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही? तर ४० आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळ स्थापन केलं तर सरकार कोसळेल असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.