मुंबईत गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद होणार?

मुंबई महानगरपालिकेकडून कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Updated: Apr 9, 2020, 02:48 PM IST
मुंबईत गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केट बंद होणार? title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील अनेक शहरांमध्ये वारंवार सूचना देऊनही लोक भाजी मार्केटमध्ये गर्दी करत असल्यामुळे सरकारकडून कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी भाजी खरेदीसाठी होत असलेल्या गर्दीविषयी चिंता व्यक्त केली. यानंतर सरकार आता ही मार्केटच बंद करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. लवकरच याबाबत सरकारकडून घोषणा केली जाईल. 

तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून कंटेनमेंट झोनमध्ये भाजी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. या 'कंटेनमेंट झोन' परिसरातील नागरिकांना तिथून बाहेर पडण्यावर व बाहेरील नागरिकांना झोन परिसरात प्रवेश करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात २४१ कंटेनमेंट झोन आहेत.

वरळीचं एनएससीआय स्टेडियम आता क्वारंटाईन वॉर्ड

तर विशेषत:दक्षिण मुंबईच्या काही भागांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्यामुळे याठिकाणी मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता पालिकेच्या जी उत्तर वॉर्डने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दादर , माहीम , धारावीतील १० ठिकाणी मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.

दरम्यान, गुरुवारी राज्यात नव्याने नोंद झालेल्या १६३ रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक १४३ रुग्ण आहेत. वरळी आणि धारावी या परिसरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, मुंबई उपनगरातील झोपडपट्टीच्या परिसरातही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने कोरोनाचा झपाट्याने फैलाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे.