'विकास वेडा झाल्यामुळे पैशाच्या जोरावर 'विजय' विकत घेण्याच्या भाजपच्या हालचाली'

गुजरातमधील विकास ‘गांडो’ झाल्यानंतर म्हणजे ठार वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे. गुजरात हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 25, 2017, 08:02 AM IST
'विकास वेडा झाल्यामुळे पैशाच्या जोरावर 'विजय' विकत घेण्याच्या भाजपच्या हालचाली' title=

मुंबई : गुजरातमधील विकास ‘गांडो’ झाल्यानंतर म्हणजे ठार वेडा झाल्यानंतर आता विजय विकत घेण्याच्या हालचाली सत्ताधारी पक्ष करीत आहे. गुजरात हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामनात लिहीलेल्या लेखात भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. आगामी गुजरात निवडणूक आणि ती जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हालचालींवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. एखाद्या राज्यास तेथील राजकारणी कसे बदनाम करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात. सध्या तिथे जो ‘तीन पत्ती’ जुगाराचा डाव खेळला जात आहे तो पाहता हे राज्य आता महात्मा गांधी व सरदार पटेलांचे राहिले नसून ते पैशांच्या जोरावर राज्य करणाऱ्यांचे झाले आहे, असा टोला ठाकरे यांनी लगावला आहे.

गुजरातमधील निवडणूक भाजपसाठी सोपी नाही

पंतप्रधान मोदी हे बरेच दिवस परदेश दौऱ्यावर गेलेले नाहीत. अलीकडे त्यांनी जास्तीत जास्त वेळ गुजरातला दिला आहे. म्हणजेच गुजरातमध्ये भाजपला आव्हान आहे व त्या पक्षासाठी विधानसभेचे मैदान सोपे नाही. मोदी म्हणजे गुजरातचे सर्वेसर्वा व हृदयसम्राट असतील आणि त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत गुजरातचा प्रचंड विकास केला असेल तर मग प्रचाराचा धुरळा न उडवता त्यांना सहज मोठा विजय मिळवता आला असता. मोदी यांनी गुजरात विकासाचे जे ‘मॉडेल’ भाषणबाजी व सोशल मीडियातून समोर आणले ते खरे आहे असे एकवेळ मान्य केले तर मग ऐन निवडणुकीत गुजरातेत बसून त्यांना घोषणांचा पाऊस व धमक्यांचा गडगडाट करावा लागत आहे?, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

कुठे आहेत ते ‘ईडी’ स्पेशालिस्ट!

मुंबईत सहा नगरसेवकांचे शिवसेनेत आगमन झाले तो भ्रष्टाचार आहे असे ज्यांना वाटते त्यांनी गुजरातेत चाललेला ‘नोटाबंदी’चा ‘गरबा’ ही ईडीच्या टिपऱ्यांनी घुमवायला नको काय? फसवणूक व खोटेपणा करून सदासर्वकाळ लोकांना मूर्ख बनवता येणार नाही, असेही ठाकरे यांनी आपल्या लेखात ठासून सांगितले आहे.