वक्फ बोर्डावरून उद्धव ठाकरे यांचं मोदी सरकारला चॅलेंज, काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी थेट मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 16, 2024, 01:52 PM IST
वक्फ बोर्डावरून उद्धव ठाकरे यांचं मोदी सरकारला चॅलेंज, काय म्हणाले उद्धव ठाकरे?  title=

Uddhav Thackeray : वक्फ बोर्डावरून महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून मोदी सरकारला चॅलेंज दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे वक्फ बोर्डाच्या निर्णयावरून कान टोचले आहेत. या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले की, आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे विधेयक आणा. आरक्षण मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर तो केंद्र सरकारला आहे.

 तुम्ही वक्फ बोर्डाचं बिल आणलं. आता मी जाहीर विचारतो. महाराष्ट्रात तुम्ही जी आरक्षणावरून मराठा आणि धनगर समाजात आग लावली. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊन ही मर्यादा वाढवा. यासंदर्भात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं बिल आणा. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण द्या. तुम्ही बिल आणा त्याला आम्ही पाठिंबा देतो. मात्र, तुम्ही फक्त आगी लावत आहात. त्यामुळे तुम्हाला आता गाडल्याशिवाय राहणार नाही. एक तर तू राहशील किंवा मी राहील. असं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा म्हणाले. 

मुख्यमंत्रीपदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना पुढचा मुख्यमंत्री कोण असेल आणि तो कसा निवडला जाणार याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती आणि यापुढे देखील कोणाची होणार नाही. महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो. या इतिहासाची पुनरावृत्ती आम्हाला करायची आहे.  मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारला जातो. मी सांगतो आता लगेच झाहीर करा. तुम्ही आता ठरवा कोण मुख्यमंत्री होणार. त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल. असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

त्या अनुभवाची पुनरावृत्ती पुन्हा नको

मुख्यमंत्री कोण होणार याबाबत आम्ही बघू काय करायचे. पण अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतला आहे. त्या अनुभवाची पुनरावृत्ती पुन्हा नको आहे. आम्ही 20-25 वर्षे सेना-भाजप युती, जगा वाटप होईच्या, मग अशाच बैठका होयच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल. त्यामुळे जास्त मुख्यमंत्री येण्यासाठी एकमेकांचे उमेदवार पाडण्याचे प्रयत्न केले जात होते.