बारावीच्या पाठ्यपुस्तकातून 'बाबरी मशीद' गायब? वाद टाळण्यासाठी गाळला इतिहास

एनसीईआरटीने १२वीच्या राज्यशास्राच्या पुस्तकातून बाबरीचा इतिहासच गाळलाय. राम मंदिरासाठी जी बाबरी मशीद पाडल्यानं सगळा वाद झाला, त्या बाबरीच्या नावाचा उल्लेखच अभ्यासक्रमातून हटवण्यात आलाय. बारावी राज्यशास्त्राच्या पुस्तकात अयोध्या बाबरी इतिहासात काटछाट करण्यात आलेय. 

वनिता कांबळे | Updated: Jun 17, 2024, 07:59 PM IST
बारावीच्या पाठ्यपुस्तकातून 'बाबरी मशीद' गायब? वाद टाळण्यासाठी गाळला इतिहास  title=

NCERT syllabus, Babri Masjid Controversy:  एनसीईआरटीने इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकात मोठे बदल केलेत. महत्त्वाचं म्हणजे 90च्या दशकापासून देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या अयोध्या बाबरी मशीद प्रकरणातला मजकूर NCERT ने पूर्णपणे बदललाय. त्यानुसार आता बारावी राज्यशास्त्राच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना कुठेही अयोध्या वाद, बाबरी मशीद, दंगल हे शब्द वाचायला मिळणार नाहीत.. कारण हे शब्दच अभ्यासक्रमातून वगळ्यात आलेत. 

बाबरी मशीद, भगवान राम, श्री राम, रथयात्रा, कारसेवा आणि विध्वंसानंतरची हिंसा याविषयीची माहिती NCERT पुस्तकातून काढून टाकण्यात आलीय. देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थेनं 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून हे शब्द काढून टाकलेत. त्याचबरोबर पुस्तकात बाबरी मशीद या नावाऐवजी तीन घुमट रचना आणि अयोध्या वाद या नावानं अयोध्या विषय शिकवला जाणारेय. 4 पानांचा विषयही 2 पानांचा करण्यात आलाय. बाबरी मशीद विध्वंस किंवा त्यानंतर झालेल्या जातीय हिंसाचाराचा संदर्भ का काढला गेला? या प्रश्नावर एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी उत्तर दिलंय. त्यांनी शाळेत दंगली का शिकवायच्या? आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत, हिंसक आणि निराशाजनक लोक नाही असं म्हटलंय. 

बारावी राज्यशास्त्र पुस्तकात अयोध्या बाबरी मशिदीचा इतिहास नव्याने लिहीला

बारावी राज्यशास्त्र पुस्तकात अयोध्या बाबरी मशिदीचा इतिहास नव्याने लिहिण्यात आला आहे.  'अयोध्या वाद'ऐवजी 'अयोध्या मुद्दा' असा उल्लेख करण्यात आला आहे 'बाबरी मशीद'ऐवजी 'तीन घुमट असलेला ढाचा' असा उल्लेख असेल. पुस्तकातून कारसेवा, बाबरी मशीद, विध्वसानंतरच्या दंगलींचा उल्लेख गाळला आहे.  अयोध्या बाबरीचा इतिहास 4 वरून 2 पानांवर आटोपता घेण्यात आला आहे. 

NCERTचे निर्देशक दिनेश प्रसाद सकलानी यांनी या बदलांबाबत स्पष्टीकरण दिलंय. विद्यार्थ्यांना दंगलींचा इतिहास शिकवण्यापेक्षा त्यांना सकारात्मक इतिहास शिकवणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी माडलं. राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास आणि भाजपकडून या बदलांचं स्वागत केलं जातंय..

एनसीईआरटीद्वारे तयार केलेली पुस्तकं केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE च्या शाळांमध्ये शिकवली जातात. त्यामुळं तब्बल 30 हजार शाळांमध्ये हा सुधारित इतिहास विद्यार्थ्यांना शिकवला जाणाराय. राजकारणात अयोध्या आणि बाबरीचा मुद्दा कायम केंद्रस्थानी राहिला... तो इतिहास विद्यार्थ्यांना कसा कळणार, हा देखील अभ्यासाचा मुद्दा ठरु शकतो.