कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे.

Updated: Aug 6, 2020, 07:38 PM IST
कोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहेत. संध्याकाळी ७ वाजता ३ आणि ६ नंबरचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यांमधून २,८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पंचगंगेची पाणी पातळी ४३ फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे नदी काठच्या परिसरात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. 

जिल्ह्यातील ९ राज्यमार्ग तर २६ जिल्हा मार्गांवर पुराचं पाणी आल्याने वाहतूक ठप्प आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर शहरातील पुराने बाधित होणाऱ्या १८ प्रभागातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुराने बाधित होणाऱ्या प्रभागातील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि नियंत्रण कक्षांशी संपर्क साधला. एनडीआरएफची राज्यात १६ पथके तैनात असून ४ पथके कोल्हापूरमध्ये आहेत.