महाराष्ट्रातील या शहरांत लॉकडाऊन सुरुच राहण्याची शक्यता

देशभरातील ११ शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा?

Updated: May 28, 2020, 01:45 PM IST
महाराष्ट्रातील या शहरांत लॉकडाऊन सुरुच राहण्याची शक्यता title=

रामराजे शिंदे, नवी दिल्ली :  कोरोना संकटामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा संपायला अवघे चार दिवस उरले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशभरातील महत्वाच्या ११ शहरांमध्ये लॉकडाऊन चालू ठेवण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देशातील प्रमुख ११ शहरांमध्ये कोरोनाचे ७० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे या शहरांत लॉकडाऊन सुरुच ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. या शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील या शहरांत लॉकडाऊन सुरु राहणार?

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे या तीन शहरांत लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही असेल अशी शक्यता आहे. या तीनही शहरांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. आणि लॉकडाऊन उठवल्यास कोरोना आणखी पसरण्याचा धोकाही आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीसह ठाणे आणि पुणे या शहरांत लॉकडाऊन आणखी वाढवले जाण्याची शक्यता आहे.

देशातील आणखी कोणत्या शहरांत लॉकडाऊन सुरु राहणार?

देशभरातील दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, चेन्नई, अहमदाबाद, सुरत, जयपूर, इंदूर या शहरांमध्येही कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तीन शहरांसह देशभरातील या शहरांमध्येही लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

धार्मिक स्थळे खुली करणार?

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात धार्मिक स्थळे खुली करण्याचा विचार सुरु आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे ३१ मे नंतर धार्मिक स्थळे खुली केली जाण्याची शक्यता आहे.

 संभाव्य लॉकडाऊन पाच मधील महत्त्वाचे मुद्दे

  • ११ शहरांत लाॅकडाऊन पाचवा सुरू राहण्याची शक्यता
  • मुंबई, पुणे आणि ठाणे शहरांचा समावेश
  • ७० टक्के पेक्षा जास्त केसेस असलेल्या शहरांत लाॅकडाऊन सुरू राहणार
  • धार्मिक स्थळे खुले करण्यावर विचार

 

लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून पुढच्या टप्प्यात देशभरात ११ शहरं वगळून अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे.