'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला

Aashish Shelar on Uddhav Thackeray: महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली होती. या विधानाची आठवण त्यांना करुन देण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 6, 2024, 04:03 PM IST
'तुम्ही मर्द आहात आशिषजी, शब्दाला जागा आणि राजकारण सोडा'; ठाकरे गटाकडून सल्ला  title=
Aashish Shelar on Uddhav Thackeray

Aashish Shelar on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलाय. भाजपने देशात 'चारशे पार'चा नारा दिला होता. तसेच राज्यातही 40 पेक्षा अधिका जागा येतील असा विश्वास दिला होता. पण प्रत्यक्षात निकाल वेगळे लागले. केंद्रात सत्ता जरी भाजपचीच राहणार असल्याचे दिसत असले तरी महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित यश मिळालेले दिसत नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे वक्तव्य चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मविआला 18 किंवा त्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी घोषणा आशिष शेलार यांनी केली होती. त्यांच्या याच घोषणेचा दाखला देत शिवसेना उबाठा गटाकडून त्यांना डिवचण्यात येत आहे. शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांवर टीका केली होती. आता ठाकरे गटाच्या आणखी एका महत्वाच्या नेत्याने आशिष शेलारांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी आशिष शेलारांवर टीका केलीय. किर्तीकुमार हे आपल्या स्पष्ट भूमिका आणि राजकीय विश्लेषणासाठी ओळखले जातात. त्यांनी आशिष शेलारांना एक पत्र लिहिलंय आणि त्यांच्या विधानाची आठवण करुन देत शब्दाला जागण्याचे आवाहन केलंय. प्रत्यक्ष निवडणुकीत तुमच्या पक्षाला 9 तर युतीला 17 जागा मिळाल्या! तुमच्या आत्मविश्वासापेक्षा फक्त 36/28 कमी!! देशात 'अब की बार 400 पार'ची घोषणा देऊन 238 जागा मिळवणाऱ्या मर्दानी नेत्यांच्या पक्षासाठी हे योग्यच; नाही का? असा प्रश्न त्यांनी आशिष शेलारांना विचारला. 

काय म्हणाले किर्तीकुमार? 

नुकताच आपला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत आपण म्हणता त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला 45 जागा मिळणे अपेक्षित होते. खरंतर महाराष्ट्रात तुम्हाला 56 जागा मिळायला हव्या होत्या. छप्पन इंच छातीच्या राजकीय विचारांचे तुम्ही महाराष्ट्रातील शिलेदार ना! पण काय करणार? महाराष्ट्रात लोकसभेच्या जागाच 48 आहेत. म्हणून 45 जागा जिंकण्याचा तुमचा मर्दानी आत्मविश्वास योग्यच असल्याची टीका त्यांनी केली. 

महाराष्ट्रात तुम्ही खरंच 45 जागा जिंकल्या असत्या तर राज्यात तुम्ही कुणालाही राजकारण सोडायला भाग पाडलं असतं. तसंही गेल्या काही वर्षांत तुमच्या पक्ष नेतृत्वाने अनेकांना राजकीय बाजारातून 'उठवलं' आहे (अजित पवार) आणि त्याहून अधिक लोकांना राजकीय बाजारातून 'उठवण्याची भीती' दाखवून (एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण) आपल्या चारित्र्यवान 'पार्टी विथ डिफरन्स'च्या राजकारणात सामावून घेतलं आहे. एखाद्याला राजकारणातून आणि आयुष्यातून 'उठवण्याचा' तुमच्या पक्षाचा स्ट्राईक रेट जबरदस्त असल्याची टीका त्यांनी शेलारांवर केलीय. 

गेल्या निवडणुकीत शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या त्या भाजपमुळेच असे विधानही शेलारांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा देखील समाचार घेण्यात आलाय. हल्ली लोकांची स्मरणशक्तीच कमी झाली आहे. म्हणूनच तर, 1989 नंतर भाजपमुळेच महाराष्ट्रात शिवसेना विस्तारली" हे सत्य नव्या पिढीला आपल्या पक्षाने सुरू केलेल्या व्हॉट्सॲप विद्यापीठाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा सांगण्याची सध्या नितांत गरज आहे. त्या काळात शिवसेनाप्रमुख तुमच्या पक्षाला 'कमळराव' अशी प्रेमाने हाक मारायचे हेसुद्धा तुमच्या ट्रोलर्सनी नव्या उत्साहाने मराठी तरुणांना सांगायला हवं. त्यासाठी गरज पडल्यास काही कोट्यवधी रुपये खर्चून सोशल मीडियाची एक नवीन योजना तुम्ही तयार करायला हवी असा सल्ला शेलारांना देण्यात आलाय.

शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे प्रमोद महाजन यांच्या घरी जाऊन नियमित बसत असत, त्यांची मनधरणी करत" हा नवीन संशोधनावर आधारित इतिहास शिकवणारा धडा आपण शालेय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करायला हवा. मनुस्मृतीपेक्षा हा धडा अधिक महत्त्वाचा आहे. आपण लवकरच त्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागाल याची मला खात्री असल्याचे शिंदे म्हणाले. 

महाविकास आघाडीला महाराष्ट्रात एकूण मिळून जरी 18 जागा जिंकता आल्या तर "मी राजकारण सोडेन, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना शेलारांनी दिलं होतं. तुमचा पक्ष आणि स्वतः तुम्ही शब्दाला पक्के आहात. कारण तुमच्यावर संस्कारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत. जे सत्य आहे- खरं आहे तेच बोलायचं आणि दिलेला शब्द पाळायचा हाच तुमच्यावर झालेला संघ संस्कार. मोदीसाहेब- शहासाहेब काय आणि फडणवीससाहेब-  शेलारसाहेब काय; तुम्ही सर्व शब्दाला पक्के! अस्सल मर्द! एक खरा मर्दच त्याने दिलेला शब्द कधी मागे घेत नाही. मोदीसाहेबांचेच बघा ना; प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचा आपला अतिमौल्यवान शब्द त्यांनी कधीच मागे घेतला नाही! खरं ना? असा खोचक टोला शेलारांना लगावण्यात आलाय. 

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपलं नाव कोरण्याची संधी आज तुमच्यासमोर हात जोडून विनवणी करत उभी आहे. मला आशा आहे की, या संधीला तुम्ही मिठीत घ्याल. तुम्ही तुमची लाखमोलाची राजकीय विश्वासार्हता जपाल असा टोला शेलारांना लगावण्यात आलाय.