मच्छर मारल्यानंतर कुणी मोजत बसतं का?- व्ही. के. सिंह

विरोधकांनी एअर स्ट्राईकच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Updated: Mar 6, 2019, 11:45 AM IST
मच्छर मारल्यानंतर कुणी मोजत बसतं का?- व्ही. के. सिंह  title=

नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मारले गेले यावरून सध्या सरकार आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मोदी सरकार याविषयी कोणतीही माहिती जाहीर करायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांनी एअर स्ट्राईकच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ही माहिती जाहीर करावी, अशी मागणी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह यांनी एक ट्विट करून लक्ष वेधून घेतले आहे. या ट्विटमध्ये व्ही.के. सिंह यांनी म्हटले आहे की, रात्री ३.३० वाजता खूप डास होते. मग मी हिट स्प्रे मारला. आता त्यानंतर मी किती डास मेले हे मोजत बसायचे का आरामात झोपी जायचे, असा सवाल व्ही.के. सिंह यांनी विचारला आहे. त्यांच्या या प्रश्नाचा रोख बालाकोटमधील एअर स्ट्राईकच्या दिशेने आहे. 

व्ही.के. सिंह यांनी मंगळवारी देखील पुलवामा हल्ल्याविषयी वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना फटकारले होते. दिग्विजय सिंह यांनी आपल्या एक ट्विटमध्ये पुलवामा हल्ल्याचा उल्लेख दुर्घटना असा केला होता. यावरून टीका करताना व्ही.के. सिंह यांनी म्हटले की, राजीव गांधींची हत्या दुर्घटना होती की दहशतवादी घटना? याचे उत्तर दिग्विजय सिंह यांनी द्यावे. त्यानंतर आपण पुलवामा हल्ल्यासंदर्भात बोलू, असा टोलाही व्ही.के सिंह यांनी लगावला होता.

दिग्विजय सिंह यांच वादग्रस्त टि्वट

भारतीय वायूदलाने पाकच्या हद्दीत शिरुन जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मारले गेले, यावरून भाजप नेत्यांकडून परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. त्यामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. 

सागरी मार्गानेही दहशतवादी हल्ल्याची शक्यता- नौदल प्रमुख