बुमराह-सिराजची कमाल, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असा विक्रम

ICC World Cup : श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत भारताने सलग चौथ्यांदा विश्वकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय ठरला असून पॉईंटटेबलमध्येही टीम इंडिया अव्वल स्थानावर पोहोचली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 2, 2023, 09:14 PM IST
बुमराह-सिराजची कमाल, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला असा विक्रम title=

ICC World Cup India vs Sri Lanka : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) सलग सातवा विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आक्रमक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने श्रीलंकेवर तब्बल 302 धावांनी विजय मिळवला (India beat Sri Lanka). मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात शुभमन गुल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने पहिली फलंदाजी करताना 357 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या वेगवान त्रिकुटाने लंकादहन करत श्रीलंकेला अवघ्या 55 धावांत गुंडाळलं. 

भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेत टीम इंडियाला यशस्वी सुरुवात करुन दिली. मोहम्मद शमीन तीन सामन्यात दुसऱ्यांदा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तीन सामन्यात शमीच्या नावावर चौदा विकेट जमा झाल्या आहेत.

भारताच्या त्रिकुटाचा भेदक मारा
बुमराह, सिराज आणि शमीच्या त्रिकुटाने श्रीलंकेला अक्षरश: धुळ चारली. या त्रिकुटाच्या गोलंदाजी समोर श्रीलंकेचे फलंदाज केवळ मैदानावर हजेरी लावून पॅव्हेलिअनमध्ये परत होते. श्रीलंकेची फलंदाजी म्हणजे हायलाईट्स वाटत होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने या सामन्यात एक कमालीचा विक्रम रचला आहे. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असा विक्रम नोंदवला गेला आहे. 

मुंबईच्या वानखेडे मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने पहिली फलंदाजी करताना  357 धावा केल्या. विराट कोहली (88 धावा), शुभमन गिल (92 धावा) आणि श्रेयस अय्यरच्या  (82 धावा) शतकापासून हुकले. पण आपल्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडिअमवर उपस्थित असलेल्या हजारो क्रिकेटप्रेंमीची मनं जिंकली. ज्या मैदानावर टीम इंडियाने धावांचा डोंगर उभा केला. त्याच खेळपट्टीवर श्रीलंकेच्या फलंदाजांनी मात्र शरणागती पत्करली. 

बुमराह-सिराजने रचला विक्रम
टीम इंडियाचा प्रमुख वेगनवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने  (Jasprit Bumrah) टीम इंडियाला सुरुवातच दणक्यात करुन दिली. बुमराहने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसंकाला एलबीडब्ल्यू केलं. त्यानंतर दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजनेही (Mohammad Siraj) तीच कमाल केली. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सिराजने दिमुत करुणारत्नेला LBW करत दुसरा धक्का दिला. श्रीलंकेची अवस्था 2 धावांवर 2 विकेट अशी झाली होती. दोन्ही सलामीच्या गोलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. भारतीय गोलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विरोधी संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांना 'गोल्डन डक' म्हणजे शुन्यावर बाद केलं. 

जसप्रीत बुमराहने पाच षटकात आठ धावा देत एक विकेट घेतली. तर मोहम्मद सिराजने 7 षटकात सोळा धावा देत तीन विकेट घेतल्या. सर्वाधिक विकेट मोहम्मद शमीने घेतल्या. शमीने 5 षटकात 18 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजाने एक विकट घेत श्रीलंकेचा गेम ओव्हर केला. या पराभावबोरबरच श्रीलंकेचं स्पर्धेतंल आव्हानही संपुष्टात आलं आहे. 

एशिया कप फायनलची पुनरावृत्ती
वानखेडेतल्या सामन्यामुळे एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती पाहिला मिळाली. श्रीलंकेतल्या कोलंबोत झालेल्या एशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला अवघ्या 50 धावात गुंडाळलं होतं. मोहम्मद सिराजने 21 धावात सहा विकेट घेण्याची कामगिरी केली होती.