भाजपवर उद्धव ठाकरे यांच्यानंतर राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. 

Updated: Jun 8, 2016, 11:56 PM IST
भाजपवर उद्धव ठाकरे यांच्यानंतर राऊत यांचा हल्लाबोल title=

औरंगाबाद : शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेनं भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंपाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. 

राज्यात निजामाच्या बापाचं राज्य सुरु आहे. अच्छे दिन कुठं आलेत? तुमच्या दोन पाच लोकांना आणि एकनाथ खडसेंना अच्छे दिन आले असतील, अशी जळजळीत टीका करत त्यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केलाय. तर शिवसेनेनं तोंडाळपणा कमी करावा असा पलटवार भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलाय. 

पंतप्रधानांवर जोरदार टीका

उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांवर टीका केलीय. भ्रष्टाचार हा परकीय भूमीवर जाऊन हशा, टाळ्या मिळवण्याचा विषय नाही. परदेशात जाऊन देशाविषयी बरं बोलायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलंय. स्वदेशातील यंत्रणेवर झोड उठवून देश-विदेशात यथेच्छ बदनामी करून जे लोक हशा व टाळ्या मिळवत आहेत त्यांना देशभक्तीचे धडे नव्याने द्यावे लागतील,' अशा तिखट शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे. 

पाच राष्ट्रांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच स्वित्झर्लंडला भेट दिली. तिथे केलेल्या  आमच्या देशात क्रिकेट, सिनेमा आणि भ्रष्टाचारावरच बोललं जातं, असं मोदी म्हणाले होते. त्यावर आमच्या देशाची बाहेर जाऊन बदनामी करू नका, अशी तिखट प्रतिक्रिया उद्धव यांनी दिलीय..

वांद्रे टर्मीनसला होम प्लॅटफॉर्मच्या उदघाटनच्या कार्यक्रमाला शिवसेनेला ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमाला शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि राजन विचारे यांनी व्याससपीठावर बसण्यास नकार दिला. त्यांनी प्रेक्षकांमधे बसून आणि काळ्या रंगाचं उपरणं घालून निषेध  निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे सत्कार स्वीकारण्यासही त्यांनी नकार दिला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात भाषणही केलं नाही.