वाणी संतांची पण वर्तणूक मंबाजीची; शिवसेनेचा भाजपला टोला

पुढील वर्षभर तरी 'ठाकरे सरकार'वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये.

Updated: Dec 20, 2019, 09:12 AM IST
वाणी संतांची पण वर्तणूक मंबाजीची; शिवसेनेचा भाजपला टोला title=

मुंबई: शिवसेनेने युती तोडून जनादेशाचा अनादर केला, अशी टीका वारंवार करणाऱ्या भाजपचा 'सामना'तून समाचार घेण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सभागृहात नको तितक्या तावातावाने बोलतात. पण त्यांचे बोलणे बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झाले आहे. सभागृहात संतांची वचने वैगेरे ऐकवून सरकारवर टीका करण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. पण ‘सत्यमेव जयते’ व ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हे सगळ्यात मोठे संतवचन पाळले असते तर भाजपवर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ आली नसती, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे. 

'कायम भाजपची पालखी वाहणार नाही, असा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता'

एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा व त्याच वेळी वर्तणूक ‘मंबाजी’सारखी करायची. विरोधी पक्षाने एकदा काय ते ठरवायला हवे. ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही. विरोधी पक्षनेते सध्या संत साहित्याचा अभ्यास करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. पुढील वर्षभर तरी 'ठाकरे सरकार'वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये. उलट विरोधी पक्षाने सावध राहावे. त्यांच्यातलेच बरेच जण सरकारचे मित्र होऊ शकतात, अशा इशाराही शिवसेनेने भाजपला दिला आहे. 

सावरकरांचं गायीबद्दलचं मत मान्य आहे का; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल