Ayodhya Verdict : 'निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही'

'सर्वोच्च न्यायालय आज गोड बातमी देणार आहे.' 

Updated: Nov 9, 2019, 10:25 AM IST
Ayodhya Verdict : 'निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही' title=

मुंबई : आजचा दिवस राजकीय नाही. अयोध्या वादावर आज निकाल थोड्याच वेळात येणार आहे. दरम्यान, राम मंदिराचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा असेल, सरकारचा नव्हे, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा जिवंत ठेवल्याचा दावा राऊतांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालय आज गोड बातमी देणार आहे. निकाल कोर्टाचा असेल, सरकारचा नाही, अयोध्येतील आंदोलनात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. शिवसैनिकांनी बलिदान दिले आहे. बाबरी मस्जिद पाडल्यावर हे काम शिवसैनिकांनी केले असेल तर ते गर्वाचे असल्याचे एकाच वाघाने म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले. राम मंदिरचा मुद्दा शिवसेनेने जीवंत ठेवलाय. अयोध्येत राम मंदिर होणार, असे सांगत काहीही पळ काढला. मात्र, शिवसेना ठाम राहिली, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत.

राजकारणापुरता राम मंदिर हा विषय आमच्यासाठी नाही आणि नव्हता. आम्ही हा विषय जीवंत ठेवला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन वेळा अयोध्येत जाऊन आलेत. कोणीही श्रेय लाटण्याचे प्रयत्न करु नयेत. योगदान सर्वांचे आहे. हा निर्णय भावनांच्या आदर करणारा असेल, तेथे राम मंदिर बनेल. १९९१ ची परिस्थिती निर्माण होणार नाही. आज गोड बातमी आज येईल, पण राजकीय नाही, टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

दरम्यान, आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. देशातल्या सर्वात मोठ्या अयोध्यातील वादग्रस्त जमिनीच्या खटल्याचा आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अयोध्येतही मोठा फौजफाटा उभा करण्यात आला आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत सर्व ठिकाणी पोलिसांनी खबदारी म्हणून सुरक्षा कडक केली आहे. पंतप्रधानांपासून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि विविध धार्मिक संघटनांच्या प्रमुखांनी शांततेचं आवाहन केले आहे.

सर्वोच्च न्यायालय थोड्याच वेळात अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देणार आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती शरद बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अब्दूल नजीर, अशोक भूषण हे खंडपीठ आज या प्रकरणात निकाल देणार आहेत. सरन्यायाधीशांसह सर्व न्यायमूर्ती निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेत. काही वेळातच निकाल येईल, अशी अपेक्षा आहे.