'सामना'चं आमच्यावर प्रेम राहणारचं, शेवटी जुनं ते सोनं असतं- नितेश राणे

काही "पत्र"आहेत माझ्या कडे..तळकोकणच्या प्रहार मधून लवकरच छापतो.. 

Updated: Jun 22, 2020, 03:31 PM IST
'सामना'चं आमच्यावर प्रेम राहणारचं, शेवटी जुनं ते सोनं असतं- नितेश राणे title=

मुंबई: 'सामना'चं आमच्यावर प्रेम आहे, असणारचं. शेवटी जुनं ते सोनं असतं, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून सोमवारी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर प्रहार करण्यात आला. यावेळी अग्रलेखातून राणे कुटुंबीयांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात आले. या टीकेला नितेश राणे यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले. 

विखेंसारखी लाचारी अंगात भिनवायला मेहनत करावी लागते; शिवसेनेची जळजळीत टीका

'सामना'चं आमच्यावर प्रेम आहे..असणारच..का नाही असणार शेवटी Old is gold!पण..काँग्रेसच्या थोरातांची इतकी चिंता पण ग्रामीण भागातल्या जुन्या कडवट शिवसेनेच्या नेत्यांना विचारायच पण नाही. काही "पत्र"आहेत माझ्या कडे..तळकोकणच्या प्रहार मधून लवकरच छापतो.. मग बघु कशी कुरकुर होते, असा टोला नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला. 

पंतप्रधानपद सोडा, पुढच्यावेळी शिवसेनेने मुंबईत महापौर तरी बसवून दाखवावा- नितेश राणे

तसेच नितेश यांनी संजय राऊत यांचाही खरपूर समाचार घेतला. 'सामना'च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर दुसऱ्याबद्दल कागाळ्या करायच्या, हा या लोकांचा उद्योग आहे. असं करून संजय राऊत यांनी स्वत:ची किंमत संपवली. ना भावाला मंत्रिपद, ना स्वत: संपादक, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली आहे. 

'सामना'च्या अग्रलेखात राणेंबद्दल काय म्हटलं होतं?
सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणाऱ्या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे-पाटील याच तडफडणाऱ्या माशांचे प्रतिनिधी आहेत. विखे यांच्यासारखे बाटगे पक्षात घेतल्यामुळे भाजपने स्वत:ची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते आहेत. पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली होती.