महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही समजेना अशी टीका काँग्रेसने केली आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 9, 2024, 03:19 PM IST
महाराष्ट्रात गुंडाराज,  राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार title=

Abhishek Ghosalkar Muder Case : महाराष्ट्रात कायद्याचे तीन तेरा वाजले आहेत, गुडांना कसलीच भिती राहिलेली नाही. कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार (Kalyan Firing), जळगाव, यवतमाळमधील गोळीबाराच्या घटनानंतर आता मुंबईत माजी नगरसेवकाची हत्या अशा घटना वाढत आहेत. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा' बंगला तसंच मंत्रालयात गुडांचा वावर बिनदक्कितपणे सुरु आहे. तडीपार गुडांना राजाश्रय, पोलीस दलामधील राजकीय हस्तक्षेप आणि दबावामुळे पोलीसही हतबल आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक असून हे 'गुंडाराज' बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असतानाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadanvis) त्याचे काहीच गांभिर्य नाही. 'गाडीखाली कुत्रा आला तरीही विरोधक गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील' असं बेजबाबदार वक्तव्य करुन त्यांनी आपल्या लाचारी आणि हतबलतेचे दर्शनच घडवलं आहे. फडणवीस यांना माणूस आणि कुत्रा याच्यातील फरकही कळत नाही का? महाराष्ट्रात आता कायद्याचे राज्य राहिले नाही. भाजपा सरकारमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात पहिल्या नंबरवर आहे. हे NCRB च्या अहवालात म्हटलं आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं.  

अवैध बंदुकीच्या बाबतीत नागपूरचा पहिला नंबर लागतो त्यानंतर ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांचा नंबर लागतो. नागपुरच्या अधिवेशनात मी हे आकडेवारीसह मांडले होते. राज्यात खैरात वाटल्यासारखे बंदुकांचे परवाने दिले जात आहे. तडीपार गुंडांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे. काही भ्रष्ट व कलंकित IPS अधिकाऱ्यांना नियम डावलून प्रमोशन दिले आहे तर प्रामाणिक व इमानदार अधिकाऱ्यांचे खच्चीकरण केले जात आहे. पोलीस दलात प्रचंड राजकीय हस्तक्षेप आणि दबाव असल्याने तेही काही कारवाई करू शकत नाहीत असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. 

गुंडांनी शासन आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभं केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीच नव्हती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात थोडीशीही नैतिकता शिल्लक असेल, जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. 

भाजपाने महाराष्ट्रात गुंडाराज आणलं आहे. सत्ताधारी सर्रास धमक्या देत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. राज्यातील जनता भयभीत आहे, महिला असुरक्षित आहेत. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे. तीन खोक्यामधील सत्तासंघर्षात जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आले आहे, असेही नाना पटोले म्हणाले.