मुख्यमंत्र्यांची अडीच महिन्यांनी उपस्थिती, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं

विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री आणि जनतेने उत्तर दिलं आहे - संजय राऊत

Updated: Jan 26, 2022, 02:52 PM IST
मुख्यमंत्र्यांची अडीच महिन्यांनी उपस्थिती, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं title=

मुंबई : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानाच्या प्रंगाणात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.

शस्त्रक्रियेनंतर तब्बल अडीच महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांत उपस्थिती लावली. मुख्यमंत्र्याच्या गैरहजेरीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांबद्दल अनेकांनी नामर्दपणाने टिका केली होती, या नामर्दपणाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री आता लोककार्यक्रमात सहभागी होऊल लागले आहेत. एका आजारी व्यक्तीबद्दल बोलताना विरोधकांच्या मनातील कचरा समोर आला आहे. आजारपण कोणावर येईल सांगता येत नाही. मुख्यमंत्र्यांचं दर्शन झाल्याने राज्याची जनता उत्साहात आणि आनंदात आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षात नामर्दानगी आहे, सध्याचा विरोधी पक्ष कोत्या वृत्तीचा असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेली प्रार्थना कोणत्या मानसिकतेची होती हे वेगळं सांगायला नको, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त गांधी कुटंबियांनी ट्विट केलं नाही याचं देवेंद्र फडणवीस यांना फार वाईट वाटलं, मग तुमच्या केंद्रातील सरकाराला त्यांना आज एखादा पद्म पुरस्कार द्यावासा का वाटला नाही? असं सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

पश्चिम बंगालच्या तीनजणांनी पद्म पुरस्कार नाकारला आहे. कदाचित पुरस्कार देताना त्यांना विचारलं गेलं नसावं, हल्ली उठसूट कुणालाही हे पुरस्कार दिले जातात. काहिंना मरणोत्तर पुरस्कार दिलेत, ते हयात असताना त्यांची किंमत का केली जात नाही? हे पायंडे थांबायला हवेत
असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.