'पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही'

शरद पवारांनी व्यक्त केलेल्या संशयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

Updated: Jun 10, 2018, 11:42 PM IST
'पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही' title=

मुंबई : मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भातील पत्राबाबत शंका उपस्थित करणारे श्री शरद पवार यांचे वक्तव्य दुर्दैवी! पंतप्रधान हे पक्षाचे नाही, तर देशाचे नेते असतात. पवार साहेबांनी देशाचे राजकारण करावे, द्वेषाचे नाही! पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत,सत्य बाहेर येईलच, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या संशयावर प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया दिली आहे. धमकीचं पत्र आल्याची बतावणी करुन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करत असल्याची टीका शरद पवारांनी केली होती.

भाजपला हरवण्यासाठी शरद पवारांची नवी रणनिती

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुण्याच राष्ट्रवादीचा मेळावा होता. यादरम्यान राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षात नाराज असलेले नेते ही यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याने यावेळी बोलतांना भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावेळी बोलतांना भाजपवर टीका केली. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची मागणी देखील यावेळी शरद पवारांनी केली.

काय बोलले शरद पवार

- नेता न निवडता मोदींना पर्याय देणार

- सर्व एकत्र आले तर भाजपचा पराभव अटळ

- वर्ष झालं तरी 50 टक्के शेतकऱ्य़ांना कर्जमाफी नाही.
 
- आतापर्यंत ईव्हीएम विषयी कोणीही संशय घेत नव्हते. मात्र आता मतदार ईव्हीएमवर संशय घेत आहेत.

- ईव्हीएमवर निवडणूक घेऊ नका. मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या.

- सर्व पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएमला विरोध करु.
 
- धमकीच्या पत्रात सत्याचा लवलेश आहे की नाही याबाबत शंका. धमकीचे पत्र आले असे सांगुन सहाभुती मिळवली जात आहे.

- निवडणूक जिंकायची असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे.

- कोरेगाव भिमा प्रकरणी भाजपकडून सत्तेचा दुरोपयोग.

- कोरेगाव भिमा दंगल कोणी घडवली हे जगजाहीर आहे. मात्र वेगळ्याच लोकांना अडकवलं जात आहे.

- पुण्यात पुरोगामी मंडळीनी एकत्र येऊन एल्गार परिषद घेतली त्यांना अटक केली. कोरेगावभीमाचा उद्योग कोणी केला हे सगळ्यांना माहित आहे.