'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.

Updated: Jul 1, 2020, 04:04 PM IST
'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा title=

मुंबई : कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत. बुधवार रात्रीपासून मुंबईत पुन्हा कलम १४४ म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. या निर्णयानंतर भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

'महाराष्ट्रात लॉकडाऊन की अनलॉक? अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे "भ्रमित ठाकरे" सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे. काय ते एकदा ठरवा, अर्थचक्र फिरवायचं का दोन किमीमध्येच फिरायचं? तातडीने निर्णय घ्या, जनतेचा संभ्रम दूर करा', अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 

मुंबईमध्ये बुधवार रात्रीपासून १५ जुलै रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या कालावधीमध्ये पहाटे ५ ते रात्री ९ वाजता अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामासाठी बाहेर पडण्याची मुभा असेल. तर, सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त २ किलोमीटरपर्यंतच्या अंतरातच प्रवास करता येणार आहे. एक किंवा त्याहून अधिक व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.