राज्यात ५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत, बाधितांची संख्या ४९०

 आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  

Updated: Apr 4, 2020, 07:36 AM IST
राज्यात ५० कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर ठणठणीत, बाधितांची संख्या  ४९०  title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.  राज्यात काल कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई,१० मुंबई परिसरातील,पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्ण,वाशिम व रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२,पुणे महानगरपालिका ४१३,नागपूर महापालिका २१०पथके कार्यरत आहेत. पथकामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून. राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत.काल पर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण केले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. दोन एप्रिलला राज्यात कोरोना बाधित ८१ नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील ५७ रुग्ण मुंबई, ६ पुणे,3 पिंपरी चिंचवड, ९ अहमदनगर, ५ ठाणे, १ बुलढाणा रुग्णाचा समावेश होता. यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४१६ इतकी होती. आता हा आकडा ४९० च्या घरात पोहोचला आहे.

पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं कोरोनाची लागण झालेल्या एका ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. मृताच्या कुटुंबियांना विलगिकरणात ठेवलं आहे. तर ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल २४ ने वाढ होऊन ती  ६४  झाली आहे. यामध्ये ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या चार महापालिका क्षेत्रांमधल्या २४ रूग्णांचा समावेश असून त्यातले सर्वाधिक ११ रुग्ण हे नवी मुंबईतलें आहेत. त्यापाठोपाठ केडीएमसी - ६, मीरा भाईंदर ५ आणि ठाण्यातल्या २ रुग्णांचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ४८ तासांनंतर दोन रुग्ण मिळाले आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित दोन रुग्ण आढळले आहेत. यातला एक रुग्ण उमरगा तालुक्यातला असून दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातल्या धानूरी इथला आहे. तो मुंबईत एका ५ स्टार हॉटेलमध्ये काम करत होता. काही दिवसापूर्वी तो गावी आला होता. त्याला तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी ठेवलं जाणार आहे, तर त्याच्या संपर्कात आलेल्या २५ जणांना गावातच विलगीकरण कक्षात ठेवले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपा मुधोळमुंडे यांनी सागितले.

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधित व्यक्ती आढळला नसून दिल्लीच्या निझामोद्दीन इथं झालेल्या मरकज मधून आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवलं आहे. त्याच्या लाळेचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. आणखी तीन व्यक्ती दिल्लीवरून आल्या असून त्यांनाही विलगीकरणात ठेवले आहे. त्यांचा मरकजशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी प्रसार माध्यमांना दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरमधील सापडलेला कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे. त्याला सध्या डॉक्टरांच्या निगरानीखाली ठेवण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हयात आढळलेला कणकवली तालुक्यातला कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बारा झाला आहे. २४ तासातले त्याचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचं जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले. मात्र या रुग्णाला पुढचे काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला धुळ्यातने तब्बल १६ जण गेले होते. याशिवाय तबलिगी जमातचे ५८ जण धुळ्यात आले होते, त्यांचा शोध घेऊन प्रशासनाने तपासणी आणि उपचार सुरु केले आहेत. यामध्ये नेपाळ तसंच मुंबई, भुवनेश्वर इथून आलेल्या प्रत्येकी ११ जणांचा समावेश आहे. अशा ७४ जणांची तपासणी केली जात आहे.