भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 10, 2024, 08:27 PM IST
भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स! title=

Vidhan Parishad Election 2024 :   विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोणत्या पक्षाचे आमदार कोणत्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणार?

भाजप आमदारांचा मुक्काम  ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे ताज लँड्स एन्डमध्ये असणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार ललित हॉटेलमध्ये. तर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार  हे  परळच्या ITC ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये असणार आहेत.

5 स्टार पॉलिटिक्सवर करोडोंची उधळपट्टी 

याआधी 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या वेळीही आमदारांची फाईव्ह स्टार हॉटेलात बडदास्त ठेवण्यात आली होती. त्यावेळी हॉटेल मुक्कामसाठी तब्बल 13 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. शिवसेनेनं त्यावेळी आपल्या 55 आमदारांना पवईच्या वेस्ट इन हॉटेलमध्ये ठेवलं होतं. चार दिवसांच्या मुक्कामासाठी शिवसेनेला 23 लाख रुपये मोजावे लागले... मात्र एवढं होऊनही शिवसेनेची मतं त्यावेळी फुटली होती... त्यानंतर एकनाथ शिंदे आणि 40 आमदार शिवसेनेतून फुटून बाहेर पडले. त्यावेळीही सूरत, गुवाहाटीमार्गे गोव्यामध्ये या आमदारांची पंचतारांकित बडदास्त ठेवण्यात आली होती..

दरम्यान, क्रॉस व्होटींगची सर्वात जास्त भीती सत्ताधारी पक्षाला वाटतेय... असं सांगत संजय राऊतांनी भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय...येत्या 12 जुलैला विधानपरिषदेची निवडणूक होणाराय. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी आपल्या आमदारांना 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवलंय... मतं फुटण्याची भीती सगळ्याच राजकीय पक्षांना आहे, हेच यातून स्पष्ट दिसतंय.