नागपूर जिल्ह्यात दोघा शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

  दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.  

Updated: Sep 3, 2020, 09:49 AM IST
नागपूर जिल्ह्यात दोघा शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू  title=
संग्रहित छाया

नागपूर : जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गजानन चचान आणि नुतेश घाटवडे असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. कोरोनाचा काळ असल्याने सध्या शाळा बंद असल्याने गावाशेजारी असलेल्या जंगलात हे दोघेही गुरं चारण्यासाठी गेले होते. यावेळी तलावात पोहोण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, दोघांचा बुडून मृत्यू झाला.

नरखेड तालुक्यातील जंगलात मच्छी तलाव आहे. या तलावात पोहोण्याचा मोह या दोन शालेय विद्यार्थ्यांना आवरता आला नाही आणि ते दोघेही तलावात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 

गुरे चारण्यासाठी गेलेले दोघे विद्यार्थी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. यावेळी दोघांची सायकल तलावाशेजारी आढळून आली. त्यानंतर तलावात शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह सापडले.