डोक्यात लोचा झालाय का? प्रकाश आंबडेकर यांचा नाना पटोले यांना संतप्त सवाल; आघाडीआधीच बिघाडी?

 Maharashtra Politics:  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रिण मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. 

Updated: Jan 25, 2024, 04:54 PM IST
 डोक्यात लोचा झालाय का? प्रकाश आंबडेकर यांचा नाना पटोले यांना संतप्त सवाल; आघाडीआधीच बिघाडी?    title=

Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे अधिकृत चर्चेचं निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.मात्र, या निमंत्रणानंतर  प्रकाश आंबडेकर भयंकर चिडले आहेत. प्रकाश आंबडेकर यांनी थेट नाना पटोले यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.  

प्रकाश आंबडेकर यांनी नाना पटोलो यांना लिहीलेले पत्र जसेच्या तसे...

श्री. नाना पटोले,

असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी श्री. रमेश चेन्नीथाला यांनी मंगळवार २३ जानेवारी रोजी काँग्रेस भवन पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्टपणे म्हटले की निवडणुका जाहीर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करण्यात येईल, जिथे तुम्ही बाजूलाच बसला होतात.

तुमच्या पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या इतर दोन जणांनी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये अगदी स्पष्टपणे मला सांगितले आहे की काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रातील युतीसंदर्भात कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेसोबत झालेल्या बैठकांमध्ये मला सांगण्यात आले आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व संभाषण राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबतच करतात आणि त्या चर्चांमध्ये तुम्हाला सहभागी केले जात नाही, कारण महाविकास आघाडी किंवा INDIA आघाडीच्या युतिसंदर्भात निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार तुम्हाला देण्यात आलेले नाहीत.

AICC किंवा काँग्रेस हाय कमांड ने महाराष्ट्रात युतिसंदर्भात निर्णय घेण्याची परवानगी तुम्हाला दिली आहे का?

काल औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की वंचित बहुजन आघडीला महाविकास आघाडीकडून निमंत्रण द्यायचे असेल तर त्यावर तिन्ही घटक पक्षांच्या अध्यक्ष, म्हणजेच श्री. उद्धव ठाकरे, श्री. शरद पवार व श्री. मल्लिकार्जुन खरगे, यांची सही असायला हवी.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) व काँग्रेस यांच्या अध्यक्षांच्या सहिनिशी सन्मानपूर्वक निमंत्रण द्या. किंवा श्री. रमेश चेन्नीथाला, श्री. राहुल गांधी, श्रीमती सोनिया गांधी अथवा श्री. मल्लिकार्जुन खरगे यापैकी कोणी वंचित बहुजन आघाडीला बैठकीसाठी बोलावल्यास कोणताही संकोच न ठेवता आम्ही त्यात सहभागी होऊ.

प्रकाश आंबेडकर
अध्यक्ष - वंचित बहुजन आघाडी