Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 12, 2024, 07:19 AM IST
Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय!  मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता title=
Maharashtra Weather News heavy to very heavy rain predictions in mumbai konkan and vidarbha latest news

Maharashtra Weather News : गुजरातपासून केरळपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे थेट परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होताना दिसत आहेत. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या काळ्या ढगांची चादर पाहायला मिळत असून, यादरम्यान जोरदार पाऊसधारा काही ठिकाणी अडचणी वाढवताना दिसत आहेत. मागील 24 तासांपासून मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संततधार पाहायला मिळाली. ज्यानंतर गुरुवारी रात्रीपासूनच शहराच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसाची सुरुवात झाली. दरम्यान, अद्याप शहरात कुठंही पाणी तुंबण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबईसह उपनगरीय क्षेत्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, कोकणातही मान्सूनच्या दृष्टीनं पूरक स्थिती निर्माण झाली असून, उत्तर कोकणाला पावसाचा तडाखा बसताना दिसणार आहे. फक्त कोकणच नव्हे, तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावरील परिसरामध्येही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेसुद्धा वाचा : शिर्डी नाही तर भारतातील 'या' गावात आहे पहिलं साई मंदिर

मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती वेगळी नाही. राज्यातील बहुतांश  जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत मान्सून सक्रिय झाला असून, त्यामुळं उत्तर मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होताना दिसत आहे. 

राज्यातील पावसाचे एकंदर तालरंग पाहता हवामान विभागानं ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुण्यातील घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

देशाच्या उत्तरेकडे पावसामुळं संकटाची परिस्थिती.... 

हिमाचल प्रदेश, उत्तराखंडपासून मेघालयपर्यत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. प्रामुख्यानं हिमाचल आणि उत्तराखंड भाग यामुळं प्रभावित झाला असून, इथं भूस्खलनाच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार हिमाचलमध्ये पावसामुळं मागील दोन आठवड्यांमध्ये साधारण 175 कोटी रुपयांचं नुकसान झालं. तर, उत्तराखंडमधील ऋषीकेश आणि बद्रिनाथ महामार्ग पावसामुळं पुन्हा बंद करण्चाकरण्यात आला. इथं BRO च्या वतीनं काम सुरु असतानाच अचानक ड्रिलिंग करणाऱ्या मशिनवर बोल्डर कोसळल्यामुळं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यातच दरडीची भीती असल्यामुळं हा  मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.