'शिंदे पिता-पूत्र माझा एन्काऊंटर करायला सांगतील' राष्ट्रवादी नेत्याच्या आरोपाने खळबळ

'ठाणे पोलीस मुख्यमंत्री शिंदे यांची प्रायव्हेट आर्मी असल्यासारखे काम करतंय', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जाणुनबूजन त्रास दिला जात असल्याचा आरोप

Updated: Jan 14, 2023, 08:58 PM IST
'शिंदे पिता-पूत्र माझा एन्काऊंटर करायला सांगतील' राष्ट्रवादी नेत्याच्या आरोपाने खळबळ title=

Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने (NCP Leader) केलेल्या गंभीर आरोपाने खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीस (Thane Police) हे मुख्यमंत्र्यांच्या प्रायव्हेट आर्मीसारखे काम करत असून पोलिसांकडून सातत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि माजी महापौर नरेश मस्के (Naresh Mhaske) यांचा दबाव असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी केला आहे.

आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप
आनंद परांजपे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे पोलिसांवर टीकेची झोड उठवली. ठाण्याचे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिंदे पिता-पुत्र आणि माजी महापौर नरेश म्हस्के एक दिवस फोन करतील आणि आनंद परांजपे यांचा एनकाऊन्टर करा अशा ऑर्डर देतील हे मला माहित आहे.  तरीही आम्ही बधणार नसल्याचं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. आनंद परांजपे यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. आंदोलनं करणं हा आमचा मूलभूत अधिकार असून पोलीस यंत्रणेचा वापर करून राज्यकर्ते आम्हाला घाबरवू शकत नाहीत असेही आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. (Anand Paranjpe allegation on CM Shinde)

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास
राज्यात घटनाबाह्य आलेलं शिंदे सरकारचा कोणी विरोध केल्यास त्याला त्रास दिला जात आहे. पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेलो आहोत, आम्ही कुणाला घाबरणार नसल्याचं आनंद परांजपे यांनी सांगितलं. ठाण्यात काही दिवसांपूर्वी काही पोस्टर लावण्यात आले होते. पन्नास खोके, एकदम ओके, भूखंडाचे श्रीखंड अशा आशयाचे हे पोस्टर्स होते. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

हे ही वाचा : चाय गरम, वडा गरम! पण सावधान... रेल्वे प्रवासात तुम्ही खाताय डर्टी वडापाव

याप्रकरणी तीन जणांना अटक करुन त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पण यानंतरही राष्ट्रवादी काँग्रसेचे शहाराध्यक्ष विक्रम खामकर आणि अभिषेक पुसाळकर यांच्या घरी जाऊन पोलिसांनी चौकशी केली. ते घरी नसताना त्यांच्या घरातील महिला आणि लहान मुलांना दमदाटी करण्यात आली. जवळपास 10 वेळा त्यांच्या घरात घुसून पोलिसांनी तपासणी केल्यााच आरोपही आनंद परांजपे यांनी केला आहे. बेकायदेशीर एफआयआर नोंदवून त्रास देण्याचे प्रकार थांबवावेत, आम्ही अशा कारवायांना घाबरणार नाही असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.