LokSabha: महायुतीचं घोडं नेमकं अडलंय? देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एक अडलं की तिन्ही पक्ष...'

LokSabha Election: महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघांवरुन धुसफूस सुरु आहे. यामुळे सर्व जागांवरील उमेदवारांची घोषण झालेली नाही. दरम्यान महायुतीत 4 ते 5 जागांवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 30, 2024, 01:19 PM IST
LokSabha: महायुतीचं घोडं नेमकं अडलंय? देवेंद्र फडणवीस म्हणाले 'एक अडलं की तिन्ही पक्ष...' title=

LokSabha Election: महायुतीने अद्यापही सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा केलेली नाही. याचं कारण महायुतीत काही जागांवरुन अद्यापही वाद सुरु असून, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. तसंच काही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर न झाल्याने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत 4 ते 5 जागांवरुन चर्चा सुरु असल्याची माहिती दिली आहे. तसंच एक ते दोन दिवसांत मिटवू असा विश्वासही व्यक्त केला आहे. माजी मंत्री, काँग्रेस नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना चाकूरकर यांनी आज भाजपात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. 

"4 ते 5 जागांवरुन अडलं आहे. एक जागा अडली की 3 जागा अडतात. आता आमच्या जागा घोषित झाल्या आहेत. राष्ट्रवादीही लवकरच करणार आहे. फार अडलं आहे अशी स्थिती नाही. थोडंसं अडलं असून एक ते दोन दिवसात मिटवू," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे. 

'अंबादास दानवे संपर्कात नाहीत'

"मराठवाड्यातील मोठ्या नेत्याने प्रवेश केला. दुसरा कोणताही नेता प्रवेश करेल अशी कोणतीही स्थिती नाही. तुम्ही अंबादास दानवे यांच्याबद्दल बोलत आहात. पण आम्ही जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा तुम्हाला कळत नाही. आणि जर ते तुम्हाला कळतं ते ऑपरेशन नसतं", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

"अंबादास दानवेंशी आमचा कोणताही संपर्क नाही. त्यांच्या प्रवेशाची आमच्यात कोणतीही चर्चा नाही", असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. निवडणुकीदरम्यान प्रवेश, भुकंप होत असतात. आज तरी असं कोणीच नाही. ज्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात उभे करत आहात त्यांच्यातील कोणीही नाही असं फडणवीस म्हणाले आहेत. 

"अमित देशमुख माझ्या संपर्कात नाहीत. त्यांच्या भाजपा प्रवेशाची कोणतीही चर्चा नाही. विरोधक असले तरी उगाच त्यांना संशयाच्या फेऱ्यात उभं करु नये," असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.  भाजपात एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात. पण सगळे एकत्र काम करत असतात. मराठवाड्यात आम्ही रेकॉर्डब्रेक विजयाची नोंद करु असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.