अहमदनगरमध्ये या २ युवा नेत्यांमध्ये 'कांटे की टक्कर'

अहमदनगर मतदारसंघातून २ युवा नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

शैलेश मुसळे | Updated: Apr 1, 2019, 05:12 PM IST
अहमदनगरमध्ये या २ युवा नेत्यांमध्ये 'कांटे की टक्कर' title=

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करतांना सुजय यांनी भव्य शक्तिप्रदर्शन केलं. तिकीट न मिळाल्यानं नाराज असलेले खासदार दिलीप गांधी हेही सुजय विखेंचा अर्ज भरताना उपस्थित होते. सुजय विखेंचे सूचक म्हणून त्यांनी हजेरी लावली. आपण नाराज नसल्याची प्रतिक्रिया यावेळी दिलीप गांधींनी माध्यमांशी बोलताना दिली.  

दुसरीकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली आहे. नगरमध्ये आता या २ युवा नेत्यांमध्ये सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीने डॉ. सुजय विखे यांच्यासाठी जागा न सोडल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संग्राम जगताप दोन वेळा नगरचे महापौर होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे अनिल राठोड यांचा पराभव केला होता. वंचित बहुजन आघाडीकरुन सुधाकर आव्हाड मैदानात आहे. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.

२०१४ चा निकाल

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादीच्या राजीव रावळे यांचा २ लाख ९ हजार १२२ मताधिक्यांनी पराभव केला.