'चवदार' पाणीपुरीसाठी भेसळ, एफडीएची कारवाई

पुऱ्यामध्ये अशुद्ध तेलाचा वापर, मुदत संपलेल साहित्य, पुऱ्या बनवण्यात येणाऱ्या ठिकाणी अस्वछता 

Updated: May 26, 2018, 07:15 AM IST

गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : तुम्ही पानीपुरी किंवा फरसाण खात असाल तर सावधान.....कारण धंदा तेजीत चालावा म्हणून कोण काय करेल याचा नेम राहिला नाही. अशावेळी त्याचा ग्राहकांच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याचाही विचार केला जात नाही. दहिसर मधील कांदारपाडा याठिकाणी  एका पाणीपुरीवाल्याने पाणीपुरीला 'चवदार' करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात भेसळ केल्याचे समोर आले आहे. अन्न औषध विभागाने या कारखान्यावर छापा टाकला. पुऱ्यामध्ये अशुद्ध तेलाचा वापर, मुदत संपलेल साहित्य, पुऱ्या बनवण्यात येणाऱ्या ठिकाणी अस्वछता असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी दिली.

नियम ढाब्यावर 

 याठिकाणी सर्व नियम ढाब्यावर बसवून हा उद्योग सुरू होता. या कारखान्याला परवानगी नसल्याची देखील माहिती समोर आली आहे. दुसरीकडे अंबरनाथ एमआय़डीसीत एका प्लॉटवर पत्र्याचा शेड उभारत गलिच्छ ठिकाणी निकृष्ट दर्जाचे शेकडो किलो फरसाण तयार करण्यात येत आहे. हेच फरसाण अंबरनाथ, बदलापूर आणि इतर शहरातील नागरीकांना विकण्यात येत आहे.