उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टीकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..."

Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना 'कलंक' शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 11, 2023, 06:06 PM IST
उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; 'कलंक' टीकेवरुन फडणवीसांचं टीकास्त्र, म्हणाले "फारच विपरित..." title=

Devendra Fadnavis on Uddhav: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करताना 'कलंक' शब्दाचा वापर केल्याने भाजपा नेत्यांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती योग्य नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. 

"मला या गोष्टीचं अत्यंत दु:ख आहे की, आमचे आजचे विरोधक आणि माजी मित्र उद्धव ठाकरे यांच्यावर सध्याच्या राजकारणाचा फारच विपरित परिणाम झाल्याचं दिसत आहे. कदाचित त्यांना मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल अशी परिस्थिती दिसत आहे. अशा मानसिक स्थितीतून ते बोलत असतील तर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. ही मानसिक स्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं होतं. 

देवेंद्र फडणवीसांच्या ट्वीटमध्ये काय होतं?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांना कलंकीचा काविळ असं म्हटलं. 

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!
7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!
असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत?

नागपुरात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. 

“देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक आहे. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? 2014 ते 2019 तुमच्याबरोबर सत्तेत होतो. 2014 साली शिवसेनेनं नाही तर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची औलाद आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

यावरुन टीका होऊ लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यावर प्रत्युत्तर दिलं. "कलंक या शब्दात लागण्यासारखं काही नाही. तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, तेव्हा त्याच्यावर भ्रष्टाचाराचा कलंक लावता. आणि आता त्यांच्याबरोबरच मांडीला मांडी लावून बसता. मग त्यांच्यावरचे आरोप खोटे होते का?,"  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.