मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जालना, बदनापूर आणि राजूरमध्ये भाजपचं आंदोलन

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणात सहभाग नोंदवला

Updated: Oct 13, 2020, 03:53 PM IST
मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी जालना, बदनापूर आणि राजूरमध्ये भाजपचं आंदोलन title=

नितेश महाजन, झी मीडिया, जालना :  जिल्ह्यातील बंद करण्यात आलेली सर्वच मंदिरं उघडण्यात यावी या मागणीसाठी जालना शहराबरोबरच राजूर आणि बदनापूरमध्ये भाजपच्या वतीने आंदोलनं करण्यात आली.जालन्यातील बडी सडक रोडवरील श्रीराम मंदिराच्या समोर साधुसंतांनी उपोषण सुरू केलंय.या उपोषणाला पाठिंबा देऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणात सहभाग नोंदवला.

तर राजूरमधील गणपती मंदिरा समोर भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे  आणि आमदार नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.या उपोषणा दरम्यान भजनं म्हणत भाजप कार्यकर्त्यांनी बंद असलेली मंदिरं उघडण्याची मागणी केली.तर बदनापूर मध्येही  भाजप कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर घोषणाबाजी करून मंदिरं उघडण्याची मागणी लावून धरली.राज्य सरकारने तातडीने मंदिरं उघडण्याबाबत निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करू असा ईशारा भाजपच्या वतीने देण्यात आलाय.

राज्यातील मंदिरं पुन्हा उघडण्याचा मुद्दा अधोरेखित करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एकपत्र लिहिलं. पत्रात त्यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करत आता त्यांनी धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे का, असा सवाल केला. ज्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्रास उत्तर देत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, अशी ठाम भूमिका मांडली आहे. 

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या पत्रास दिलेलं उत्तर पाहता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष राज्याच्या राजकारणात डोकं वर काढत असल्याचं दिसत आहे.